24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त
होणाऱ्या विशेष ग्रामसभेस श्रीमती रॉय राहणार उपस्थित
जळगाव, दि. 19 - पंचायत राज संस्थांचे
बळकटीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानात जिल्ह्यातून
एकमेव निवड झालेल्या वडगाव, ता. रावेर येथे केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या
व राबवावयाच्या विविध योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व
यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे निर्देश आज केंद्रीय महिला व बाल विकास विभागाच्या
उपसचिव स्विप्रा रॉय दिले.
ग्राम स्वराज्य अभियानात निवड झालेल्या वडगाव,
ता. रावेर येथे राबविण्यात येत असलेल्या केंद्रीय योजनांचा आढावा घेण्याकरीता
श्रीमती रॉय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या
आढावा बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिलेत.
यावेळी
त्यांच्यासमवेत केंद्रीय पर्यटन विभागाचे अवर सचिव स्वामिंद्र चंद्रा,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, अग्रणी बँकेचे
श्री. भावसार, महिला व बालविकास अधिकारी श्री. तडवी यांचेसह तालुकास्तरीय अधिकारी
उपस्थित होते.
पंचायत
राज संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून (14 एप्रिल) ते 5 मे 2018 या
कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत काल (18
एप्रिल रोजी) स्वच्छ भारत दिवसानिमित्ताने केंद्रीय महिला व बाल विकास विभागाच्या
उपसचिव स्विप्रा रॉय व पर्यटन विभागाचे अवर सचिव स्वामिंद्र चंद्रा यांच्या द्विसदस्यीय
पथकाने वडगाव, ता. रावेर येथे भेट दिली. व तेथे सुरु असलेल्या कामांची,
स्वच्छतेची, शाळेची पाहणी केली असता त्यांनी समाधान व्यक्त केले होते. तथापि, गांवकऱ्यांशी
संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतांना ग्रामस्थांनी त्यांच्याकडे काही
योजनांचा लाभ मिळण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने या गावात सबका साथ सबका
गाव सबका विकास या विशेष मोहिमेद्वारे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उजाला योजना,
प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य),
प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योतीबीमा योजना, प्रधानमंत्री
सुरक्षा बीमा योजना व मिशन इंद्रधनुष्य या सात योजना 100 टक्के राबविण्याचा केंद्र
शासनाचा मानस आहे. या योजनांबाबत त्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून माहिती
घेतली. त्यावेळी श्रीमती रॉय म्हणाल्या की, वडगावातील या योजनांचा लाभ खऱ्या
लाभार्थ्यांना मिळावा याकरीता स्थानिक यंत्रणेने खरे लाभार्थी शोधून त्यांना
केंद्र शासनाच्या या योजनांची माहिती द्यावी, पात्र लाभार्थ्यांना योजनांचे लाभ
समजावून सांगावे व त्यांना लाभ घेण्याचे आवाहन करुन त्यांचेकडून आवश्यक ती पूर्तता
करुन घ्यावी व त्यांना योजनांचे लाभ देण्यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करण्याचे
आवाहनही श्रीमती रॉय यांनी केले.
त्याचबरोबर
वडगावात ग्राम स्वराज्य अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी या अभियानातील सर्व दिवस
जसे 20 एप्रिल रोजी उज्वला दिवस, 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस, 28
एप्रिल रोजी ग्राम स्वराज्य दिवस, 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस, 2 मे रोजी किसान
कल्याण दिवस, 5 मे 2018 रोजी आजिविका दिवस तर 14 ते 24 एप्रिल या कालावधीत पोषण
अभियान यासारखे विशेष कार्यक्रम राबविण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी
उपस्थितांना दिल्यात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरणांतर्गत येत्या 24 एप्रिल रोजी
आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनी गावात विशेष ग्रामसभेचे
आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या दिनास उपस्थित राहण्यासाठी श्रीमती रॉय
ह्या पुन्हा वडगावला येणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
सामाजिक
सलोखा व अभिसरण वृध्दींगत करणे, ग्रामीण भागातील गरींबांपर्यंत पोहचणे,
सद्यस्थितीत कार्यरत योजनांबाबत माहिती घेणे, नवीन उपक्रमांमध्ये समावेश करुन
घेणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, स्वच्छतासारख्या राष्ट्रीय स्तरावरील
कार्यक्रमांना पुढे घेऊन जाणे व पंचायत राजसंस्थांचे बळकटीकरण करणे. या उद्देशाने
भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 14 एप्रिल ते 5 मे, 2018 या कालावधीत ग्राम
स्वराज्य अभियान राबविण्याचे निश्चित केले असून या अभियानात जिल्ह्यातील वडगाव,
ता. रावेर या एकमेव गावाची निवड करण्यात आली आहे.
000
No comments:
Post a Comment