Wednesday, 4 April 2018

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला खरीप हंगाम पूर्वतयारीचा संबधित विभागांचा आढावा

            जळगाव, दि. 4 - येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावू लागू नये. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुखकर जावा, यासाठी लवकरच राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्वतयारी करीता जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांही तयारीला लागल्या असून संबंधित यंत्रणांनी केलेल्या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
    यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी मागील वर्षी जिल्ह्यात शेतीसाठी झालेला कर्जपुरवठा, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत सहकारी व राष्ट्रीयकृत बँकामार्फत जिल्हयातील शेतक-यांना देण्यात आलेला लाभ, कापूस पिकाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या बीटी बियाणांची मागणी व उपलब्धता, खतांची मागणी, शेतीसाठी उपलब्ध करुन देण्यात असलेली वीज व पाणी, गुलाबी बोंडअळीमुळे झालेले नुकसान, आधारभूत खरेदी केंद्रामार्फत जिल्ह्यात सुरु असलेली खरेदी आदिं विषयांचा संबंधित विभागाचा आढावा या बैठकीत घेतला.
    यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक पी. पी. गिलाणकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री. साळुंखे यांचेसह पाटबंधारे महामंडळ, महाबीज, तेलबीया संशोधन केंद्र, राष्ट्रीय बीज निगम आदिंचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                                         000

No comments:

Post a Comment