Friday, 13 April 2018

उष्माघातापासुन नागरीकांचा बचाव करण्यासाठी उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न


          जळगाव, दि. 13 - भारतीय हवामान खात्याने यावर्षी देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची सुरवात नेहमीपेक्षा लवकर होणार असून उष्णतेची लाट दिर्घकाळापर्यंत रहाणार असल्याचा अंदाज वर्तविलेला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हापातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.
               या बैठकीत  जिल्ह्यातील वाढते तापमान व उष्माघातापासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करणेबाबत श्री. राहूल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रास्तावीकात शासनाच्या महसुल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) आपत्ती व्यवस्थापन प्रभागाद्वारे प्राप्त झालेल्या सुचनांबाबतची माहिती दिली. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणुन नेमण्यात यावे. उष्णतेच्या लाटेची पुर्व अनुमानेची सुचना निर्गमित करण्याची जबाबदारी तसेच उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाययोजना राबविण्याची जबाबदारी ही नोडल अधिकारी यांची असणार आहे. तालुकास्तरावर तहसिलदार हे नोडल अधिकारी असणार आहे. स्थानिक माध्यमांचा वापर करुन उष्णतेच्या लाटेबाबत नागरिकांनी ‘काय करावे व काय करु नये’याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात यावे. जिल्हयातील मंदिरे, सार्वजनिक इमारती/हॉल, उद्याने दुपारी सुध्दा उघडी ठेवावीत, जेणेकरुन नागरीकांना दुपारच्या वेळेस आश्रय घेता येईल. जिल्ह्यामध्ये पुरेशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.   या कालावधीत रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वीत करावी व महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी.
         यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या हस्ते उष्णतेच्या लाटेबाबत नागरिकांनी ‘काय करावे व काय करु नये’ याबाबत जनजागृती करणेकामी तयार करण्यात आलेल्या रंगीत भित्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिका-यांनी योग्य त्या उपाययोजना व दक्षता घेण्याच्या सुचना दिल्यात.
                         या बैठकीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा राजेश कानडे, विभागीय नियंत्रक, म. रा. प. मंडळ श्री. देवरे यांच्यासह आरोग्य व सुरक्षा विभागाचे संचालक, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, रेडक्रॉस सोसायटी, वन्यजीव संरक्षण संस्था, आदि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिह रावळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नागरीकांनी उष्माघातापासून बचावासाठी खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
        हे करा -
            उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेह-यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.  तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या. अशक्तापणा, कमजोरी असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवास करतांना सोबत पाणी घ्या. ओआरएस, घरची लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबु पाणी, ताक इत्यादी घ्या. आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा. जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या. फॅनचा वापर करा, थंड पाण्याचे आंघोळ करा.
        हे करु नका -
            दुपारी 12 ते 3 उन्हात फिरु नका. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.  पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका, त्यामुळे डिहाईड्रेशन होते.
०००

No comments:

Post a Comment