महाराष्ट्र सुवर्ण जयंती
नगरोत्थान महाअभियानातंर्गत जामनेर नगरपरिषदेच्या
28 कोटी रुपयांच्या वाढीव
पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण व
68 कोटी रुपयांच्या
भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनेचे भूमिपूजन संपन्न
जळगाव, दि. 16 - जामनेर शहरातील नागरीकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी वाघूर
धरणातून जलवाहिनीव्दारे थेट पाणीपुरवठा करणाऱ्या 36 कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे
काम येत्या मार्च 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती
नगरोत्थान महाअभियानातंर्गत 28 कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या
लोकार्पणामुळे नागरीकांना मुबलक व शुध्द पाणी मिळणार आहे. तसेच लवकरच 68 कोटी
रुपयांच्या भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनाही कार्यान्वित होणार असल्याने
शहरातील नागरीकांना आवश्यक
असलेल्या मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात जामनेर नगरपरिषद राज्यात आघाडीवर
असल्याची गौरवोद्गार जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत जामनेर नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा
योजनेचे लोकार्पण व भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनेचे भूमिपूजन आज येथील
शिवाजी चौकात जलसंपदामंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन होत्या.
यावेळी मंत्री
श्री. महाजन म्हणाले की, येथील कन्या शाळेच्या मोकळ्या मैदानावर 300 गाळ्यांचे
सुसज्ज व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरातील बेरोजगारांना रोजगार
उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबरच जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या टेक्सटाईल पार्कसाठी
शासकीय जमीनीची अधिग्रहण प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच तालुक्यात एमआयडीसी स्थापन
करण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना
वरदान ठरणा-या टेक्सटाईल पार्कची उभारणी नजीकच्या काळात पूर्ण करण्यासाठी कटीबध्द
असून याठिकाणी कापसावर प्रक्रीया करणाऱ्या जिंनींग उद्योगाची उभारणी होणार
असल्याने येथे मोठे उद्योग येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव तर मिळणारच
आहे. परंतु जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे
असे सांगून मंत्री महाजन पुढे म्हणाले की, जामनेर शहरात अत्याधुनिक बसपोर्ट तयार
करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून या कामास लवकरच सुरुवात होणार
आहे. शहरात 112 किलोमीटर लांबीच्या भुयारी गटार कामाचे आज भूमिपुजन झाल्यामुळे
शहरातील उघड्या गटारी बंद होणार आहे. यामुळे शहरातील रोगराईला आळा बसणार
असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन
देण्यासाठी नगरपरिषदेने सोनबर्डी टेकडीवर 8.5 दशलक्षलीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण
केंद्र बांधले आहे. शहरात चांगले जलतरणपटू तयार व्हावेत यासाठी सोनबर्डी येथे
जलतरण तलाव बांधण्यात येत असून या तलावाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण
व झोपडपट्टी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत शहरात 1238 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेनुसार सर्वांसाठी घरे या योजनेतंर्गत
शहरातील नागरीकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
शहरातील शिवाजी नगर-न्यु इंग्लिश स्कुल ते पहुर चौफुली पर्यंतच्या रस्त्याचे
चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून नगारखाना ते पुरा भागास जोडणाऱ्या कांग
नदीवरील पुलामुळे वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. वैशिष्टपूर्ण
योजनेअंतर्गत शहरातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी
प्राप्त झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शहरातील विविध भागात महिला व
पुरुषासाठी स्वतंत्र शौचालये व स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त
जामनेर, स्वच्छ-सुंदर जामनेर संकल्पनेस मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरातील
विविध समाजाच्या विकासाठी भरीव तरतुद करुन शादी हॉल, सामाजिक सभागृहाचे बांधकाम
प्रगतीपथावर असून लवकरच नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस
स्टेशन आदि इमारतींचे बांधकाम लवकरच सुरु होणार असल्याचेही श्री. महाजन यांनी
सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या
महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण,
मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, जिल्हा
परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक,
नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment