Wednesday, 6 December 2017

झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल उपक्रमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न - विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी






    जळगाव, दि. 6 - झिरो पेंडन्सी ॲन्ड डेली  डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) उपक्रमामुळे शासकीय कार्यालयातून जनतेची कामे वेळेवर होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रशासकीय कामकाजातही गती येणार असल्याने हा उपक्रम सामान्य माणसाला दिलासा देणारा ठरणार आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होवून उपक्रम यशस्वी करावा. असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
     ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी, 2018 पासून राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अंतर्गतच्या कार्यालयांसाठी झिरो पेंन्डसी व डेली डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रणालीची  यशस्वी अंमलबजावणी  करणेसाठी नाशिक विभागातील जिल्हा परिषदांसाठी येथील कांताई सभागृहात विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त श्री. दळवी हे बोलत होते.
     या कार्यशाळेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भारुड, जळगाव जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन, नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपायुक्त (आस्थापना) सुकदेव बनकर, उपायुक्त (विकास) श्री. मित्रगोत्री उपस्थित होते.
     यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. दळवी पुढे म्हणाले की, झिरो पेंडन्सीची प्रमूख उद्दिष्टे ही कार्यालयातील अभिलेख  व अभिलेख कक्ष अद्यावत करणे, अनावश्यक कागदपत्रे नाश करणे, कार्यालय आणि कार्यालयाचा परिसर स्वच्छ करणे ही आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांना पुरेशा सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांचा प्रशासन व शासनावरील विश्वास वाढणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  हा उपक्रम म्हणजे आपले उत्तरदायित्व समजून यामध्ये हिरारीने सहभाग घेऊन नागरीकांच्या अडचणींप्रती आपली संवेदनशीलता निर्माण करावी. यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. तसेच नागरीकांना अधिकाराचा कायदा व सेवा हमी कायदा वापरण्याची गरज भासणार नाही. एवढेच नाहीतर झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल हा उपक्रम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:साठी  राबवावा. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना स्वत:च्या आरोग्यासाठी पर्यावरणपुरक व निरोगी वातावरण मिळण्यास होण्यास मदत होणार असल्याचेही श्री. दळवी यांनी सांगितले.
     नागरीक आपल्याकडे वैयक्तिक कामे, शासकीय कामे, सामाईक कामे व सामुदायिक कामांसाठी येत असतात. अशावेळी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नागरीकांमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी वेगळी भावना निर्माण होते. येत्या दोन महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांपासून ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. पुणे विभागात हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. मार्गदर्शनाच्या शेवटी श्री. दळवी म्हणाले की, मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात करा. तुम्ही मनात जे ठरवाल ते नक्कीच घडेल. ठरविले तर  काहीही अशक्य नसल्याचे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले. त्याचबरोबर नाशिक विभागातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल यासाठी जळगाव जिल्हा परिषद मार्गदर्शकाची भूमिका बजावेल असा आशावादही श्री. दळवी यांनी व्यक्त केला.  तसेच या उपक्रमाची पार्श्वभूमी तसेच आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय. पुणे, जमाबंदी आयुक्तालय, पुणे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांमध्ये हा उपक्रम कशाप्रकारे राबविला, त्याचे झालेले फायदे आदिबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने कार्यालयाचे मूलभूत व्यवस्थापन, त्याअंतर्गत सिक्स बंडल सिस्टीम, कार्यालयीन स्वच्छता, नीटनेटकेपणा, कार्यालयीन नोंदवहया, प्रशासकीय कामकाजामधील  प्रलंबितता, विलंबाची  कारणे, अभिलेख्यांचे वर्गीकरण, झिरो पेंडन्सीची उद्दीष्टे, नागरीकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकाभिमुख व गतीमान प्रशासन, ई गव्हर्नन्स व एम गव्हर्नन्स बाबींना चालना देणे, यासाठी दैनंदिन निर्गतीची कार्यपध्दती प्रस्थापित करणे आदि विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
    कार्यशाळेच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन  कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यात येतील. गुणात्मक विकासासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
     सर्वप्रथम सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र भारुड यांनी  सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राबविलेल्या झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अभियानाचे सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी मानले. या कार्यशाळेस नाशिक विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख, कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.                                                          
                                                                             00000

No comments:

Post a Comment