Saturday, 30 December 2017

अमृत योजनेमुळे भुसावळ शहराचा 50 वर्षांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार -- पालकमंत्री चंद्रकांत पाटील








        जळगाव दि. 30 :- अमृत योजनेमुळे भुसावळ शहराचा 50 वर्षांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार असून नागरिकांना  शुध्द पिण्याचे पाणी मिळणार आहे.  यासाठी पुढील लोकसंख्येचा विचार करुन योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्या असल्याचे प्रतिपादन महसुल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भुसावळ शहराची महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या व पुढील 50 वर्षांचा शहराचा पाणीप्रश्‍न मिटविणाऱ्या ‘अमृत योजने’ला मंजुरी मिळाली असून या योजनेचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण येथील तापी नगर फिल्टर हाऊसच्या आवारात महसुल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार एकनाथराव खडसे हे होते.
यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार ए. टी. पाटील, आमदार संजय सावकारे, उपविभागीय अधिकारी अविनाश चिंचकर, तहसिलदार नाईकवडे,  महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, पोलीस उपअधीक्षक निलोत्पल, नगराध्यक्ष रमण भोळे, फैजपुर नगरपरिषदेच्या  नगराध्यक्षा महानंदा होले, सावदाचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता येवले, माजी आमदार निळकंठ फालक, रेल्वे विभागाचे डीआरएम यादव, भुसावळ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, बांधकाम सभापती प्रतिभा वसंत पाटील, आरोग्य सभापती दिपाली बऱ्हाटे, शिक्षण सभापती शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, जैन एरिगेशन समुहाचे प्रतिनिधी भोळे, गटनेते मुन्ना तेली, नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका  उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, भुसावळ शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून अमृत योजनेसारखी मोठी पाण्याची योजनेची आवश्यकता होती.  तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी भूमिगत गटार योजना, मैला वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे अशा योजना टप्याटप्याने होणार आहेत.  यामुळे रस्ते पुन्हा खोदावे लागू नये यासाठी या योजना लवकरात लवकर मंजूर करुन त्या सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अमृत पिण्‍याच्या पाण्याची योजना, भुमिगत गटारी, चांगल्या दर्जाचे रस्ते असे एकत्रित पॅकेज केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन पूर्ण करीत आहे.  नगरपालिकेने सांडपाणी पक्रिया करुन ते विकणे किंवा शेतकऱ्यांना देणे. सांडपाणी शुध्द करणे, देशात शहरी भागात वाढ झाल्याने त्या शहरांना स्वच्छ पिण्याचे पाणी देणे, वेगवेगळया प्रकारच्या कचऱ्याची व्यवस्था लावणे, रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट चांगल्या कशा राहतील असा सर्व प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे.  शहरातील वाढती रहदारी सुरळीत होण्यासाठी रेल्वे खालुन जाणाऱ्या रेल्वे ब्रीजसाठी 6 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यातील निम्मी रक्कम 3 कोटी भरण्यासाठी ब्रीजचे काम थांबले असेल तर ब्रीज तयार करण्यासाठी ही रक्कमही भरण्यात येईल. शहरातून जाणाऱ्या बाहेरील वाहनांची रहदारी कमी करण्यासाठी रिंगरोडचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येईल.  येत्या वर्षभरात राज्यातील 43 हजार गावांना शुध्द पाणी मिळण्यासाठी  फिल्टर प्रोजेक्ट देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  जळगाव जिल्हयातील सर्व गावांना शुध्द पाणी मिळण्यासाठी फिल्टर देण्यात येणार आहे. या फिल्टर पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी अतिशय कमी किंमतीत पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले पाणी एटीएम मधून मिळेल. गावाने फक्त वीज बिलाची व्यवस्था केली पाहिजे.  पाण्याच्या योजनेच्या वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी नगरपरिषदेचे मोकळ्या भुखंडावर सोलर पॅनल सारखे प्रोजेक्ट रावबून महावितरणाला वीज दिल्यास पाणी योजनेचा वीज बिलाचा प्रश्न सुटू शकेल. तसेच उर्वरीत वीज गावासाठी वापरता येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार रक्षा खडसे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी  शासन चांगल्या योजना राबवित असते. या योजना सुरु राहण्यासाठी नागरिकांना पाण्याचा वापर काटसरीने करावा. 
आमदार संजय सावकारे म्हणाले की, पुढील 50 वर्षाचे नियोजन करुन अमृत योजना तयार करण्यात आली आहे. शहरातील  विकासकामे करतांना सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. लोकांचा पैसा वाया जात असेल तर तेथे नक्कीच विरोध करावा. शाश्वत पाणी मिळण्यासाठी नवीन धरण बांधण्यात येणार असल्याने वीज बिलात बचत होईल. यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगत परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. योजनेचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याने यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्ष रमण भोळे यावेळी म्हणाले की, भुसावळ शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले अमृत योजनेत नवीन धरण बांधण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन गार्डन, बोटींची सुविधा, वॉटर पार्क निर्माण करण्यात येईल. स्वच्छतेसाठी शहरात घंटागाड्या सुरु करण्यात आल्या. भुसावळ नगरपालिका हगणदारी मुक्त झाली आहे. शहरात नवीन मोठी 4 उद्याने तयार करण्यात येणार आहे. मोकळया जागेत जाँगिंग पार्क, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी साधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नगर परिषदेसाठी नवीन इमारत तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी एक वर्षात नाट्यगृह तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भुसावळ शहरासाठी शासनाने अमृत योजना मंजूर केली असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. रहदारीचा प्रश्न सी.सी.टी.व्ही. च्या माध्यमातून सुटू शकेल. तसेच  शांततेच्या दृष्टीनेही याचे नियोजन करता येईल. शासन अनेक योजना राबवित आहे. या योजना नागरिकांच्या सहकार्याने, सहभागाने पूर्ण होणार आहेत.
प्रास्तविकात मुख्याधिकारी बाविस्कर यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यात 43 शहरांमध्ये अमृत योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र योजनेच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करणारी भुसावळ नगर पालिका ही एकमात्र आहे. अमृत योजना सन 2017-18 या वर्षात मंजूर करण्यात आली असून सन 2018-19 या वर्षात भूमिगत गटारींची योजना मंजूर करण्यात येणार आहे.  यात नवीन 11 जलकुंभ तयार करणे, नवीन धरण तयार करणे, 230 किमी एचडीए म्हणजे गंजविरहीत पाईप लाईन टाकणे ही कामे करण्यात येणार आहे. तसेच या जलकुंभांची उंची 18 ते 20 मीटर उंच असल्याने शेवटच्या नळालाही चांगल्या दाबाने पाणी मिळणार आहे.  या योजनांची कामे झाल्यावर लगेच नवीन रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. योजनेचे ठेकेदार जैन एरिगेशनकडून दीड ते पाऊणे दोन वर्षात योजनापूर्ण करण्याचा मानस आहे. वर्षभरात या योजनेला मंजुरी मिळवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत आहे.  योजनेच्या पहिल्या टप्प्यात 88 कोटीची मंजुरी मिळाली आहे. या कामास तुकाराम नगर, मामाजी टॉकीज पासून सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन  व कोनशिला अनावरण महसुल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुसावळ नगरपरिषेचे नगरसेविका यांनी मान्यवरांचे औक्षण केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनिल नेवे यांनी केले तर पाणीपुरवठा सभापती किरण कोलते यांनी आभार मानले.
0000

No comments:

Post a Comment