जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व
वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उदघाटन् संपन्न
जळगाव, दि. 16:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण
केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार
असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती व प्रमुख
आश्रयदाते व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई च्या कार्यकारी अध्यक्ष श्रीमती
विजया कमलेश तहिलरामाणी यांनी व्यक्त केले.
येथील
जिल्हा न्यायालयाच्या आवारात मुख्य न्यायमूर्ती श्रीमती व्ही. के. तहिलरामाणी
यांच्या हस्ते न्याय सदन सेवा इमारतीचे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक
वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना
मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई उच्च्
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. व्ही. गंगापुरवाला, मुंबई उच्च्
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संगीतराव एस. पाटील, प्रमुख जिल्हा
व सत्र न्यायाधीश तथा चेअरमन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव कु. सविता टी.
बारणे, जळगाव वकिल संघाचे अध्यक्ष ॲङ आर. आर. महाजन, जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे सचिव कौशिक ठोंबरे उपस्थित होते.
यावेळी
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्रीमती तहिलरामाणी पुढे म्हणाल्या की, देशातील
प्रत्येक नागरीकाला स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे. नागरीकांना आपल्या
अधिकाराचा वापर करण्यासाठी कायद्याने त्यांना आवश्यक ते संरक्षण उपलब्ध करुन दिले
आहे. या अधिकारांचा वापर योग्य ठिकाणी व योग्य वेळी होणे आवश्यक आहे. तसेच नागरीकांच्या
अधिकारांचे संरक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी न्यायालये आपली भूमिका पार पाडतात. लोक
अदालत, न्याय पंचायत, जलद न्यायालय, समुपदेशन केंद्र, वैकल्पिक वाद निवारण
केंद्राच्या माध्यमातून नागरीकांना जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे
वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जळगाव
हे पश्चिम भारतातील महत्वाचे शहर असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, गेल्या 7
वर्षात जिल्ह्यात प्रलंबित दावे निकाली काढण्याच्या कामास गती आली आहे. जिल्हा न्यायालय
इमारतीच्या व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी
यावेळी दिले.
मुंबई
उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. व्ही. गंगापुरवाला
म्हणाले की, समाजातील ज्या नागरीकांना न्यायालयात जाणे शक्य होत नाही. ते नागरीक
विधी सेवा प्राधिकरणाकडे आपले म्हणणे मांडून न्याय मिळवू शकतात. जळगाव मध्ये
झालेल्या लोक अदालत, जलद न्यायालय, समुपदेशनाच्या माध्यमातून 12 हजार पेक्षा अधिक
दावे निकाली काढण्यात आली आहे. यामध्ये भूसंपादन, मोटार अपघात, कौटूंबिक वादाच्या
दाव्यांचा समावेश आहे.
मुंबई
उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील म्हणाले की,
देशात दाव्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लोक अदालत, समुपदेशन केंद्र, विधी
सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात
येत आहे.
प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा चेअरमन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव कु. सविता
बारणे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करुन दिला. जिल्ह्यात झालेल्या लोक अदालतीच्या
माध्यमातून दोन हजारापेक्षा जास्त दावे निकाली काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच
जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी नवीन जागांची पाहणी सुरु असून लवकरच जागा निश्चित
करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या
प्रास्ताविकात ज्येष्ठ वकिल ॲड प्रकाश पाटील यांनी समुपदेशनाचे महत्व व उपयुक्तता
सांगितली.
जिल्हा
वकिल संघाचे अध्यक्ष ॲङ आर. आर महाजन यांनी जळगाव जिल्हा वकिल संघाला उज्वल परंपरा
असल्याचे सांगताना देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ॲड उज्वल निकम हे
या संघाचे सदसय् असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच न्यायालयीन इमारतीला नवीन
ठिकाणी जागा मिळावी तसेच वकिलांसाठी लायब्ररी उभारण्याची विनंती केली.
कार्यक्रमाच्या
सुरुवातीस जिल्हा न्यायालयातील वकिलांनी प्रार्थना म्हटली. कार्यक्रमाची सुरुवात
दीपप्रज्वजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे जिल्हा न्यायालय, जिल्हा
वकिल संघ, न्यायालय कर्मचारी संघटना आदिंच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,
स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
या
कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय
कराळे, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, पोलीस उप
अधिक्षक निलोत्पल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तहसीलदार अमोल निकम,
जिल्हा सरकारी वकिल ॲड केतन ढाके यांचेसह जिल्ह्यातील न्यायाधीश, वकिल संघाचे पदाधिकारी, सदस्य, वकिल
वर्ग तसेच कायद्याचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी व मान्यवर
मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन ॲङ मुजुमदार यांनी केले. उपस्थितांचे आभार कौशिक ठोंबरे यांनी मानले.
000
No comments:
Post a Comment