Monday, 10 September 2018

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषि विभागाचे आवाहन

     जळगाव, दि. 10 - सद्यस्थितीत कपाशीचे पीक पात्या, फुले व बोंड अवस्थेत आहे. जुनच्या पहिल्या आठव्यात पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा 5 ते 10 टक्के पर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात दिसुन आला. सद्यस्थितीत हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फेरोमोन सापळे, डोमकळ्या वेचुन नष्ट करणे, निंबोळी अर्काची फवारणी व लक्षणीय प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक किटकनाशकांचा वापर इत्यादीचा पिकाचे अवस्थेनुसार वेळीच वापर करुन या किडीच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात यावा. यासाठी सर्व कृषि विभागाची विस्तार यंत्रणा अशासकीय यंत्रणा, तसेच कृषि विद्यापीठाचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व बोंड अळीच्या नियंत्रणाची व्युहरचना आखून अंमलबजावणी सुरु आहे.
     कृषि विद्यापीठाचे किटकशास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे पिकसंरक्षणाचे विशेषज्ञ यांची सर्व जिल्ह्यात नेमणुक करुन त्यांना विद्यार्थ्यासोबत, कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिका-यांसोबत संलग्नीत करण्यात आले आहे. त्यांचेमार्फत तालुका पातळीवर गुलाबी बोंडअळी तसेच भातावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाच्या स्थितीवर नियमित निरीक्षण ठेवून या किडीमुळे आर्थिक नुकसान होण्याची संभावना असल्यास त्वरीत शेतक-यांना अवगत करुन नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याबाबत जनजागरण करण्यात येत आहे.
            सद्यस्थितीत राज्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 5 टक्के पेक्षा कमी असुन, सध्या किड अळी व कोशावस्थेत आहे. त्यामुळे पतंगाचे प्रमाण कमी झाले असुन कामगंध सापळ्यामध्ये पतंग कमी येत आहेत. गुलाबी बोंड अळीचे पतंग निषाचर असल्यामुळे अंधा-या रात्री ( 12 ते 3 वा.) त्याचे मिलन होऊन अंडी देतात. विशेषत: या प्रक्रियेत अमावस्येच्या दरम्यान वाढ होते. तर अमावस्येनंतर जसा जसा चंद्र कलेने वाढत जातो तसा अंड्यातुन अळ्या निघण्याचे प्रमाण वाढते. गुलाबी बोंड अळीची सर्वसाधारण हि दुसरी पिढी तयार होण्याची वेळ आहे. म्हणून सप्टेंबरच्या पहिल्या व दुस-या आठवड्यात पतंगाची कामगंध सापळ्यामधील संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे झाल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची एक फवारणी करावी व डोमकळ्या वेचुन नष्ट कराव्या. तर कामगंध सापळे लावुन (एकरी आठ सापळे) सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याने नष्ट करावे. वेस्टनावर दिलेल्या सुचनेनुसार कामगंध वडी बदलावी. डोमकळ्या बोंड व किडग्रस्त वेचुन नष्ठ करणे याबाबी सुरु ठेवाव्यात. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी (5 टक्के प्रादुर्भाव) गाठल्यास किटकनाशकांची 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
     थायोडीकार्ब 75 टक्के 20 ग्रॅम किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 10 मिली किंवा क्विनोल्फोस 25 टक्के 20 मिली वापरावे. तसेच 10/15 दिवसानंतर क्लोरपायरिफोस 20 टक्के 25 मिली ची फवारणी करावी. आवशकता भासल्यास पुढील मिश्र किटकनाशकाची दुसरी फवारणी करावी. प्रोफेनोफॉस 40 टक्के + सापरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा क्लोरेट्रेनीलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के, 5 मीली किंवा डेल्डामेथ्रीन 1 टक्के + ट्रायझोफॉस 35 टक्के 10 ते 12 मिली वापरावे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकांची प्रति हेक्टरी 60 हजार अंडी याप्रमाणे प्रसारण करावे आणि पुढील 10 दिवसापर्यंत कीटकनाशक फवारणी टाळावी. पिकाच्या 70 ते 75 दिवसापर्यंत सींथेटीक पायरोथ्राईड किटकनाशकांची फवारणी करु नये. त्यामुळे पाढ-या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
     एकच एक किटकनाशक परत परत वापरु नये, त्यामुळे किडीमध्ये प्रतीकारशक्ती वाढते. फवारणी शांत वारा असतांना हवेच्या दिशेने तेही सकाळी 11 वाजेपर्यंत किंवा सायंकाळी चार नंतर करावी. फवारणी करतांना संरक्षक कपड्यांचा वापर करावा. ज्या गावात/भागात किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तेथील संपूर्ण कापूस क्षेत्रावर शेतक-यांनी एकाच वेळी सामुहिक पध्दतीने औषधांची फवारणी करावी. जेणेकरुन किडीचा इतर भागात प्रसार रोखण्यास मदत होईल. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                          ०००

No comments:

Post a Comment