जळगाव, दि. ७ - जिल्ह्यातील नागरीकांना
आरोग्याच्या सुविधा तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याकरीता जिल्हयात ज्या ज्या
ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय उभारणे आवश्यक आहे.
तेथील आरोग्य केंद्र उभारणीचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत. तसेच धरणगाव व एरंडोल
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांना आयएसओ मानांकर मिळण्यासाठी आरोग्य विभागाने
प्रयत्न करावेत. असे निर्देश सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आरोग्य
विभागास दिले.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाची आढावा
बैठक राज्यमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात
संपन्न झाली, यावेळी त्यांनी निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा आरोग्य
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. एन.एस. चव्हाण,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांचेसह धरणगाव व जळगाव तालुक्यातील
आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राज्यमंत्री ना. पाटील
म्हणाले की, म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी भेट
देण्यात येऊन स्थानिक नागरीकांच्या म्हणणे ऐकून घेऊन जागा निश्चित करण्यात येईल.
तसेच म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोली येथे वर्ग करण्यासाठी प्रस्ताव
तयार करावा. म्हसावद येथील नागरीकांना आरोग्यसेवा तातडीने उपलब्ध होण्यासाठी 108
क्रमाकांची रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी. तसेच निराधार नागरीकांना वयाचे
दाखल्यांसाठी जिल्हा रुग्णालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही याकरीता सदरचे
दाखले ग्रामीण रुग्णालयातून देण्याची व्यवस्था करण्याच्या सुचनाही ना. पाटील यांनी
आरोग्य विभागास दिल्यात.
शहरातील अनेक वैद्यकीय व्यावसायिक
आरोग्य सुविधांच्या नावाखाली गोरगरीब जनतेची लुट करीत आहेत. त्यावर पायबंद
घालण्यासाठी आरोग्य विभागाने कार्यवाही करावी. सर्वसामान्य रुग्णांना शहरात
आरोग्यसेवा उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी जिल्हा रुग्णालयात पुरेशा औषधांचा पुरवठा
ठेवावा, जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन व्हेंटीलेटर आदि सुविधा सुस्थितीत
राहतील याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. त्याचबरोबर गर्भवती महिलांसाठी जिल्हा
रुग्णालयात पुरेश्या खाटांची व्यवस्था असावी. उपलब्ध जागा कमी पडत असेल तर दुसऱ्या
वार्डातील जागा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही ना. पाटील
यांनी दिल्यात. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाची दैनंदिन स्वच्छता होईल याकडे लक्ष
देणे आवश्यक आहे.
आशा वर्कर या ग्रामीण भागातील
शासनाच्या कामकाजातील महत्वाचा दुवा असल्याने त्यांचे वेतन वेळेवर होईल यासाठी
प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यात स्वाईन प्ल्यु, डेंगू यासारखे आजार होणार नाही
यासाठी जनतेने घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करावी. तसेच नागरीकांना रक्ताचा
पुरवठा वेळेत व्हावा. जिल्ह्यातील कोणीही रुग्ण रक्त उपलब्ध झाले नाही याकरीता
दगावू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामार्फत् 18 ते 60 वयोगटातील
नागरीकांची रक्तगट तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देशही यावेळी ना. पाटील यांनी
आरोग्य विभागास दिले. या बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे
सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment