Monday, 24 September 2018

कापुस पिकासाठी सद्यस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत कृषि विभागाचे आवाहन


            जळगाव, दि. 24- सद्य परिस्थितीत कापूस पिक वाढीची महत्वाची बोंडे भरणे व बोंडे पोसण्याची अवस्था असल्याने व जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट येऊ शकते. याकरीता कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत कृषि विभागाने व्यक्त केले.
           मुलस्थानी जलसंधारण होण्यासाठी पिकात सरी वरंबा काढावा किंवा शेवटच्या कोळपणीच्या वेळेस कोळप्याला दो-या बांधून पिकाला मातीची भर लावून घ्यावी. संरक्षीत पाणी दयावे. ठिबकची व्यवस्था असल्यास जमिनीच्या मगदुरानुसार प्रति दिवस 2 ते 3 तास पाणी देऊन जमीन कायम वाफसा परिस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. पिकाला पाण्याचा मोठा ताण पडल्यास पाते, फुले, लहान बोंडाची गळ होते व त्यानंतर पिकास पाणी दिले किंवा पाऊस आल्यास पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्या बाबतीत शेतकऱ्यांनी जागरुक रहावे असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
           सिंचनाच्या पाण्याची कमी उपलब्धता असल्यास पिकाला सरी आड सरी पाणी द्यावे. कोरडवाहू लागवडीमध्ये पिकाला पाणी देण्याची काहीही सोय नसल्यास हलक्या कोळपण्या करुन मातीचा वरील स्थर भुसभुसीत ठेवावा. जेणेकरुन आच्छादनासारखा उपयोग होऊन जमिनीवरुन बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी होईल. पिकाला 1.5 टक्के पोटॅशियम नायट्रेट ( 13:00:45) ह्या विद्राव्य खताची फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
            पिकामधील दोन ओळीत पिकांचे अवशेष अंथरुण आच्छादन करता आल्यास तसे करावे. पिकाची कायीक वाढ जास्त झाली असल्यास पिकांचा मुख्य शेंडा व उपफाद्यांचे शेंडे खुडावे. शेत तणविरहित ठेवावे, जेणेकरुन तणे पाण्यासाठी पिकांशी स्पर्धा करु शकणार नाहीत. केवोलीन ह्या बाष्परोधकाची 8 टक्के फवारणी करावी. त्यामुळे झाडाचा बाष्पीभवनाचा वेग कमी होईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                          ०००

No comments:

Post a Comment