Wednesday, 19 September 2018

व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन आवश्यक - प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले


             
         जळगाव, दि. 19 - स्वत:चे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी वाचन आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आपल्या विकासासाठी दैनंदिन दिनचर्येत वाचनास महत्व द्यावे. असे प्रतिपादन फैजपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी व्यक्त केले.

            जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव, कै. दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी, धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त्‍ विद्ममाने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य वाचक मेळाव्यात’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. थोरबोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, महाविद्यालयचे समन्वयक प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. गोपाळ कोल्हे उपस्थित होते.
लोकराज्य मासिकातील लेखनशैलीचा माझ्यावर प्रभाव
            यावेळी बोलतांना डॉ. थोरबोले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपली राहणी साधी ठेवून उच्च विचारांची कास धरावी. यासाठी आपल्या व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य द्यावे. मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता विद्यार्थ्यांनी बोलायला शिकले पाहिजे. चांगले बोलता येण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. विद्यार्थ्यांनी सोपी लेखनशैली असलेल्या पुस्तकांचे वाचन करावे. कारण सोप्या लेखनशैलीमुळे अवघड विषयही समजण्यास मदत होते. असे सांगून ते पुढे म्हणाले की, माझ्या जीवनावर लोकराज्य मासिकातील लेखनशैलीचा प्रभाव आहे असे गौरोवोद्वगारही त्यांनी काढले.
खड्डयातून बाहेर पडा
            डॉ. थोरबोले पुढे म्हणाले की, मोबाईच्या जास्त वापरामुळे सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी झाली आहे. त्यामुळे  
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या जास्त आहारी न जाता वाचनास प्राधान्य द्यावे. मोबाईलचा अति वापर हा आपल्या जीवनात पडलेला एक खड्डा आहे असे मी मानतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या खड्डयातून बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यानुसार पुढील  वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते असे सांगून त्यांनी नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले.
            याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी लोकराज्य वाचक अभियानाचा उद्देश, लोकराज्य मासिकाची उपयुक्तता आदिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. गोपाळ कोल्हे राज्य शासनाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक यांनीही मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महाविद्यालयचे समन्वयक प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. भंगाळे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment