Friday, 28 September 2018

मतदार यादीत नांव नोंदविणे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य - विभागीय आयुक्त राजाराम माने




         जळगाव दि. 28 - मतदानास पात्र ठरणाऱ्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे. व मतदान प्रक्रिया निर्दोष होण्यासाठी आपली माहिती अचुक नोंद बाबी असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक राजाराम माने यांनी आज केले.
भारत निवडणूक आयोमामार्फत सुरु असलेल्या छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुरनिक्षणाबात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात आज विभागीय आयुक्‍त श्री. माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरीक्त मुख्य अधिकारी संजय म्हस्कर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी रविंद भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, निवडणूक तहसीलदार थोरात आदि उपस्थित होते.
        विभागीय आयुक्त श्री. माने यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपला देश विकासाकडे वाटचाल करीत असताना मतदारांनी मतदार यादीत नांव नोंदविणे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे. मतदान प्रक्रिया निर्दोश होण्यासाठी मतदारांनी आपली अचूक माहिती नोंदवावी. जेणेकरुन मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल. यादृष्टीने लोकहितासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घेवून तरुण मतदारांना मतदार नोंदणीमध्ये सहभागी करावे. त्याचबरोबर सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीसाठी प्रचार व प्रसार व्हावा यासाठी यंत्रणांनी काम करावे. विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी योग्य गुणवत्तेचा लोकप्रतिनिधी निवडून देणे आपले कर्तव्य आहे. काही वर्षापूर्वी मतदानाची टक्केवारी कमी असायची परंतु आता परिस्थिती बदली असून मतदारांमध्ये जनजागृती व निवडणूक प्रक्रिया अचुक व जलद होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
     मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत जिल्ह्यात चांगले काम सुरु असून राजकिय पक्षांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. असे सांगून विभागीय आयुक्त श्री. माने म्हणाले की, दिव्यांग मतदार नोंदणीतही जळगाव जिल्हा राज्यात पहिला येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी केलेल्या सूचना निवडणूक आयोगाला कळविल्या जातील. असेही श्री माने यांनी सांगितले.
     बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. हा कार्यक्रम 31 ऑक्टोंबर, 2018 पर्यंत सुरु राहणार असून या कालावधीत मतदार यादी नावनोंदणी व दुरुस्ती याबाबत कार्यवाही करण्यात येईल. राजकीय पक्षांनी बीएलए ची नियुक्ती करावी. मतदार नोंदणीचे कोरे अर्ज  http://ceo.maharashtra,gov,in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यासाठी Down Load Forms  या लिंकवर क्लिक करुन प्रिंट घेता येईल. नवयुवक, दिव्यांग आणि महिला मतदारांच्या नोंदणीसाठी भर द्यावा. ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्रे नाहीत त्यांनी छायाचित्रे संकलनासाठी सहकार्य करावे. मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी 31 ऑक्टोंबर  2018 पर्यंत आहे. 30 नोव्हेंबर 2018 रोजी दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी आहे. 3 जानेवारी 2009  रोजी डाटाबेस अद्ययावतीकरण करण्यात येईल. 4 जानेवारी, 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल त्यांनी सांगितले.
     उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांनी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची चित्रफितीद्वारे माहिती देतांना जिल्ह्यातील मतदारांची संख्या, दिव्यांग मतदारांची संख्या, जनजागृतीबाब करण्यात येत असलेल्या उपाययोजना, सैनिक मतदार, अति महत्वाच्या व्यक्तींची माहिती फोटोसह मतदारांची संख्या आदिबाबतची माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले.     
     या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व निवडणूक यंत्रणेशी निगडीत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
     यावेळी विवेकानंद विद्यालयाच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी  मतदार यादीत नाव नोंदविण्याबाबत आवाहनात्मक पथनाट्य सादर केले.
                                                                           ०००

No comments:

Post a Comment