Monday, 10 September 2018

“लोकराज्य” मासिक ठरतेय प्रत्येक मराठी कुटुंबाची शान


खासलेख
            लोकराज्य मासिक म्हणजे तमाम मराठी जनतेच्या आशा आकांशा, परंपरा, समृध्द प्राचीन संस्कृती, इतिहास व प्रगतीचे दर्शन घडविणारा आरसाच आहे. आज लोकराज्य मासिक लाखो मराठी जनतेच्या प्रखर अभिमानाचा विषय झाला आहे. मार्च 1947 मध्ये सुरू झालेले लोकराज्य साप्ताहिक 1964 साली ऑक्टोंबर महिन्या पासून पाक्षिक झाले. महाराष्ट्र शासनाचे हे लोकराज्य मासिकाचे प्रकाशन फेब्रुवारी 2000 पासून करण्यात आले. सन 2006 मध्ये बदलत्या काळानुसार या मासिकाने कात टाकली आणि नोव्हेंबर 2006 पासून लोकराज्य मराठी अंक नव्या स्वरुपात आकर्षक असा प्रकाशित होवू लागला. जुलै 2018 मध्ये 70 व्या वर्षात पदार्पण केलेल्या लोकराज्याचे रुप व स्वरुप अत्यंत आकर्षक, सुंदर आणि संग्राह्य असे बनले आहे.
                                     सर्वाधिक खपाचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मासिक 
              लोकराज्यमासिकाच्या खपाचा विचार केला तर देशातील वृत्तपत्रे नियतकालिकांच्या खपाची तपासणी करणाऱ्या ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ए.बी.सी) या संस्थेने प्रमाणित केल्यानुसार लोकराज्य देशातील सर्वाधिक खपाचे दुसऱ्या क्रमांकाचे नियतकालिक ठरले आहे. दर महिन्यास साडेचार लाख (4.5लाख) एवढ्या प्रती छापल्या जाणाऱ्या या लोकराज्य मासिकाचे सुमारे 50 लाखाहून अधिक वाचक आहेत. ही अभिमानाचीच बाब आहे. मात्र ही अभिमानाची बाब अधिक सार्थकी ठरवायची असल्यास  लोकराज्य अंक यापेक्षाही जास्त वाचकांच्या हाती पोहोचला पाहिजे. म्हणजेच लोकराज्य देशातील सर्वाधिक खपाचे मासिक ठरले पाहिजे. त्यासाठी मराठी जनतेने वाचक अन् ग्राहक म्हणून लोकराज्याची आजची वैशिष्ठ्ये लक्षात घेण्याबरोबरच त्यातील अत्यंत महत्वपुर्ण शासकीय निर्णयाच्या माहितीची आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठीची अपरिहार्यता प्रत्येक कुटुंबाने लक्षात घेवून लोकराज्याचे वार्षिक वर्गणीदार झाले पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्राच्या लोकराज्य चा झेंडा देशात सर्वाधिक उंच फडकेल!
                                          कर्तृत्ववान धुरिणांनी दिले माहिती समृध्द अंक
            लोकराज्याची धुरा त्या-त्या काळात तत्कालीन माहिती व जनसंपर्क विभाग सांभाळणारे महाराष्ट्र शासनाचे सचिव, महासंचालक यांनी विभागाचे संचालक आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या महाय्याने अत्यंत समर्थपणे सांभाळली. वेळोवेळी अंकाची मांडणी, छपाई, छायाचित्रे, माहिती व अर्थपूर्ण लेख यांचा समावेशाकरिता लोकराज्याचा अंक वाचाकांना मनापासून आवडेल यादृष्टीने त्यात नाविन्य आणले. सौंदर्य व कलात्मकता ओतली शिवाय विविध विषयांच्या समावेशाने सर्वसमावेशकता आणली. त्यामुळे  अंकात कोकणातील नारळांच्या बागांनी बहरलेले निसर्ग सौंदर्य लाभलेले स्वच्छ समुद्र किनारे असो की, सह्याद्रिच्या कडांवरील दुर्गम रायगडासह असंख्य प्राचीन किल्ले, मराठवाड्यातील अजिंठा, वेरुळचे जगप्रसिध्द सौंदर्य शिल्प असो की, अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीतील मेळघाट चिखलदरा, चंद्रपुर मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प असो. लोकराज्य ने वाचकांना अतिशय मन:पूर्वक महाराष्ट्राचे एकहाती दर्शन घडविण्याचे जणू  व्रतच घेतले आहे! काळानुरूप अन्य नियतकालिकांच्या तुलनेत लोकराज्य अधिक सुंदर आकर्षक माहितीपूर्ण राहिल यावर भर देत तो लोकप्रिय करण्याचा प्रयत्न होत आहे.
                  लोकराज्यचे अनेक संग्राह्य अंक म्हणजे साहित्यातील हिरे माणकेच!
लोकराज्यने वेळेावेळी जे खास विशेषांक प्रकाशित केले ते म्हणजे मराठी साहित्य विश्वात अत्यंत मोलाची लक्षणीय भर घालणारे काहिनूर हिरेच ठरावेत! कोट्यावधि भाविकांचे श्रध्दास्थान असलेले संतश्रेष्ठ, संत शिरोमणी, वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तजन्मशताब्दी निमित्त लोकराज्याचा ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी हा पोथी  स्वरुपातील आडव्या आकारातील अंक तर लोकराज्यच्या  किर्तीत प्रचंड भर घालणारा जबरदस्त ग्रंथ शिरोमणीच ठरला! वेळोवेळी प्रकाशित झालेल्या खास विशेषांकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, पुज्य साने गुरूजी, कविवर्य भा.रा.तांबे. महात्मा गांधी, नटश्रेष्ठ बालगंधर्व, सेनापती बापट, लता मंगेशकर, शिक्षणमहर्षि कर्मवीर भाऊराव पाटील, वसुंधरा असे अत्यंत वाचनीय माहितीपूर्ण असे अनेक विशेषांक लोकराज्यने वाचकांच्या हाती दिले. त्यामुळे अनेक महान संत-महंतांपासून विविध क्षेत्रातील ऋिषितुल्य व्यक्तिमत्व व त्यांच्या महान कार्याचे अत्यंत चांगले, समर्पक, सम्यक दर्शन लोकराज्य द्वारे वेळोवेळी लाखो लोकांना घडले. लोकराज्य मासिक सध्या मराठीसह हिंदी, इंग्रजी, उूर्द, गुजराथीतूनही सुरू करण्यात आले आहे! अत्यंत मौल्यवान माहितीपूर्ण लेख, विविध उपक्रम निर्णयांची अंमलबजावणी व पूर्तता, राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेणारे कर्तृत्ववान नवे अधिकाऱ्यांचे नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे त्यांचे विचार असे विविध अगांनी सजलेले लोकराज्य एम.पी.एस.सी,, यु.पी.एस.सी च्या परिक्षा देणाऱ्या व स्वत:सह देशाचे राज्याचे अन समाजाचेही भविष्य उज्वल करणाऱ्या हजारो तरूण तरणींपासून ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार अशा सर्वांनाच उपयुक्त ठरणारा असा लोकराज्य अंक आहे. कारण या मासिकात सर्वंकष लिखाणाबरोबरच राज्य शासनाचे विविध खात्यांशी संबंधित शासन निर्णय कयद्यातील सुधारणा, नवनवीन योजनांची सविस्तर माहिती अक्षरश: सर्वांनाच उपयुक्त ठरणारी असते. खूप कष्ठ करून वेळ व पैसा खर्च करूनही जी माहिती पुरेशी व वेळेवर मिळू शकणारा नाही अशी माहिती शासन निर्णय आपणास लोकराज्य अंकातून घरबसल्या सहज उपलब्ध होत असते.  ती ही अल्प अशा वार्षिक वर्गणीच्या माध्यमातुन तर ही गोष्ट किती उपयुक्त ठरेल? असंख्य बाबी आपल्या मुला, नातवांच्याही हिताच्या यात आहेत हे आणखी महत्वाचे!
लोकराज्यची वैशिष्ठये!
            लोकराच्याची प्रसंगानुरूप प्रकाशित होणारी प्रकाशने, विशेषांक हे तर अत्यंत माहितीपूर्ण असतातच! पण ती आपल्या मनाची नुसती तहानच भागवीत नाहीत तर आपल्या मनाची संवेदनशिलता, राज्यातील प्राचीनतेची लेणी सांभाळणाऱ्या स्थळांबाबतची आत्मीयता, श्रेष्ठ संतांच्या मानतेप्रती नम्रता, गडकिल्यांपासून ते जलाशये, सरोवरे, धरणांपासून विशालता शिकवितात. लोकराज्य ची वाटचाल खूप मोठी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरील विशेषांक वाचले तर असे वाटते की, जर हे विशेषांक स्वत: डॉ. बाबासाहेबांनी वाचले असते तर त्यांनी तृप्त होवून त्यांच्याबद्दल अत्यंत सहृदयतेने इतकी माहिती जी इतरांना नव्हती. ती दिलेली पाहून लेखकाच्या पाठीवर अनेकदा कौतुकाची थाप मारली असती! आनंदा बरोबरच हृदय पिळवटून कृष्णा कोयना गोदावरीच्या कोरड्या धरणांनाही पाझर फोडण्याचे सामर्थ मनापासून लिहिणाऱ्या लेखकाच्या शब्दात असते! अशा शब्दांची रास लोकराज्याने वेळोवेळी देवून जनतेप्रती कृतज्ञताच व्यक्त केली आहे. अर्थात सरकारचे सुजाण व सकस नेतृत्व व त्यांची योग्य साथ ही तेवढीच महत्वाची असते. तर एखाद्या आय.पी.एस अधिकारी नेतृत्व मिळताच लोकराज्याची उंची अधिकच वाढविण्यात सहभागी होतो!  अशा या सर्वेातोपयोगी, सर्वकाळोपयोगी  लोकराज्य चे देशात सर्वाधिक खपाचे प्रथम स्थान ठरावे ही अपेक्षा आहे. कारण लोकराज्य मराठी मनाची महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे फक्त 75 गावेच लोकराज्य युक्त नको तर प्रत्येक घर लोकराज्य युक्त झाले पाहिजे, ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्व प्रयत्न करु या.
***-----***
   शिवलाल बारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव.

No comments:

Post a Comment