Tuesday, 31 October 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

               जळगाव दि.  ३१- अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत असल्याची माहिती खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी दिली आहे.                       
     या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदवीका परिक्षेमध्ये ६०टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा ५० टक्के आहे.
     या योजनेअंतर्गत राज्यातील अनूसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणा-या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी ठराविक रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
     मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपुर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्ता २० हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये तर इतर महसुल विभागीय शहरात व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २८ हजार रुपये, निवास भत्ता १५ हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये तर  जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता२५ हजार रुपये, निवास भत्ता १२ हजार रुपये, निर्वाह भत्ता ६ हजार रुपये इतका अनुज्ञेय आहे. या रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्याना प्रती वर्ष रुपये २ हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
     या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sisa.maharashtra .gov.in,http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढलेले आहे. त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष, टपालाव्दारे अथवा कार्यालयाच्या ई मेल वर १५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा.
     अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.                       
                                         00000

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

    जळगाव, दि. 31 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
     बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रेल्वेस्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 पाळधी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 12 वा. 30 मि.नी पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3 वा 30 मि.नी. पाचोरा, जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा  आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. सायं 5.30 वा धरणगांवकडे प्रयाण. सांयकाळी 7.00 वाजता धरणगाव येथे गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमूख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जी. एस. लॉन्स, मातोश्री नगर, धरणगाव. रात्री नऊ वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस दलाचे पथ संचलन संपन्न




        जळगाव दि. 31 :- राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने पोलीस विभागाचे पथ संचलन आज सायंकाळी संपन्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारातून या पथ संचलानास सुरुवात झाली. आकाशवाणी चौक मार्गे काव्य रत्नावली चौकात या पथ संचलनाचा समारोप करण्यात आला.  या पथ संचलनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) रशीद तडवी आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
            या पथ संचलनात गृहरक्षक दल, राष्ट्रीय कॅडेट कोअर, शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी झाले होते. आकर्षक पोषाख, शिस्तबद्ध संचलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले होते.
00000

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



        जळगाव दि.  ३१ - पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यामध्ये मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेतंर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजनानावाने नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पायाभुत सोईसुविधांसह २० मेंढया आणि १ नर अशा गटांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील भटक्या जमाती भज-क या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
            या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भटक्या जमाती – क या प्रवर्गातील असावा. लाभधारकाचे वय १८ ते ६० असावे. ही योजना १ ते  १५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत  सकाळी साडेदहा वाजेपासून  ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू राहील. अर्जदारांनी आपले अर्ज दिलेल्या कालावधी मध्ये ऑनलाईन www.http//.mahamesh.in या बेबसाईटवर भरुन सादर करावे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तजळगाव यांनी कळविले आहे.
00000

पशुसंवर्धन राज्यमंत्री ना. अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 31 - राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अर्जुन खोतकर हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा बुधवार 1 नोव्हेंबर  रोजीचा  दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
     बुधवार 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता दर्शना बंगला जालना येथून मोटारीने पाचोरा जि. जळगावकडे रवाना. (मार्गे-जालना-सिल्लोड-फर्दापूर-जळगाव), दुपारी 3.00 वा. पाचोरा जि. जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 वा. मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पाचोरा नगर परिषद, पाचोरा आयोजित विविध विकास कामांच्या भुमिपुजन सोहळ्यास व जाहिर सभेस प्रमुख उपस्थिती. (स्थळ :- मानसिंग मैदान, जामनेर रोड, पाचोरा), सोईनुसार पाचोरा, जि. जळगाव येथून मोटारीने दर्शना बंगला, जालनाकडे प्रयाण.                              0000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 31 - आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, पेठरोड, नाशिक, पिंप्रीसद्देादिन ता. इगतपुरी, जिल्हा नाशिक, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार, अजमेर सौंदाणे ता. बागलाण, जिल्हा नाशिक, मवेशी ता. अकोला, जिल्हा अहमदनगर व पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी मध्ये तसेच इयत्ता 7 वी ते 9 च्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे साठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अंमळनेर, जि. जळगाव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता. जामनेर, जि. जळगाव या दोन परिक्षा केंद्रावर स्पर्धा परिक्षा रविवार 25 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे.
     अनुसूचित जमाती मधील जे विद्यार्थी सन 2017-18 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वी च्या वर्गात शिकत असून, परीक्षेला बसलेले आहेत. व पुढील वर्षी इयत्ता 6 वी मध्ये तसेच 7 वी ते 9 मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांचेकडे 18 डिसेंबर, 2017 पर्यंत अर्ज करावेत.
     अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच मुख्याध्यापक व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहे. सदर परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या इ. 5वी पास ते 9 वी च्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. एक लाखाच्या आत असावे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. अर्जासोबत सक्षम अधिका-यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा आरक्षित राहतील. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.
                                                               ०००००

परिवहन विभागाच्या १६ सेवा ऑनलाईन सुरु

             जळगाव दि.  ३१ - परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे परिपत्रकानुसार वाहन तपासणी पथक यांनी वाहनांवरील देण्यात येणा-या १६ प्रकारच्या सेवा ऑनलाईन पध्दतीने सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन त्या सर्व नमुन्यांची प्रिंट विहीत शुल्काचा ऑनलाईन भरणा करुन मुळ नोंदणी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा कराव्यात. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
          ऑनलाईन सुरु करण्यात आलेल्या सेवांची यादी Vahan Online Services, Tranfer of  Ownership, Transfer of Ownership in case of death, Sale of vehile in case of auction, change in address, Hypothecation addition, Hypothecation termination, pay your tax, Duplicate RC, issue of NOC, online appointment for fitness inspection, Alteration of vehicle, Duplicate of registration, Renwal of registration, conversion of vehicle, RC Cancellation, Application for Trade certificate याप्रमाणे आहे.
00000

परिवहन वाहनांची ब्रेक व योग्यता प्रमाणपत्र तपासणी खाजगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यावर घेण्यास प्रतिबंध जिल्ह्यातील वाहनधारकांनी नजिकच्या जिल्हयातून तपासणी करुन घेण्याचे आवाहन

     जळगाव, दि. 31 - परिवहन वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे आवश्यक आहे. अशी तपासणी 1 नोव्हेंबर 2017 पासून इतर कोणत्याही खाजगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यावर घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
     परिवहन विभागाच्या 40 कार्यालयांच्या ताब्यतील शासकीय जागांवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारणेची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी 14 ठिकाणी असे ट्रॅक उपलब्ध आहेत. मा. न्यायालयाचे आदेश विचारात घेता 1 नोव्हेंबर 2017 पासून उर्वरित 26 ठिकाणी अशी चाचणी नजिकच्या कार्यालयातील शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेण्यात येईल. ही कार्यपध्दती गोंदीया, अकलूज, सातारा, ठाणे, नागपूर (शहर) व मुंबईमधील 4 परिवहन कार्यालयांना लागू नाही.
     त्यामुळे जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहतूकदारांनी त्यांची वाहने तपासणीसाठी 1 नोव्हेंबर 2017 पासून पुढीलपैकी कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर (ग्रामीण), अकोला व यवतमाळ यापैकी कोणत्याही शहरात तपासणीसाठी न्यावीत, ही पध्दती पुढील आदेश होईपर्यंत चालू राहील. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
                                                                      ०००००

आधारभूत किंमत योजनेतंर्गत जिल्ह्यात 19 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर आजपासून खरेदी केंद्र होणार सुरु

              जळगाव, दि. 31 - शासनाने सन 2017-18 या खरीप पणन हंगामात ज्वारी, मका, बाजरी हे भरडधान्य आधारभुत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार जिल्ह्यात एकुण 19 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजुर केले आहे. या केंद्रामार्फत चालु हंगामात शासनाच्यावतीने 1 नोव्हेंबर पासून भरडधान्य खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
            या धान्य खरेदी केंद्रावर ज्वारी, मका, बाजरी या भरडधान्याची खरेदी करण्यात येणार असून ज्वारी (संकरीत) 1 हजार 700 रुपये प्रति क्विटल, ज्वारी (मालदांडी) प्रती क्विंटल 1 हजार 725 रुपये, मका 1 हजार 425 रुपये प्रति क्विंटल, तर बाजरी 1 हजार 425 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे. सर्व साधारण गुणवत्ता दर्जाचेच (एफ.ए.क्यु.) धान्य या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी याच दर्जाचे धान्य खरेदी केंद्रावर आणावे.
            भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) हे 1 नोव्हेंबर, 2017 ते 31 डिसेंबर, 2017 या कालावधीत तालुकास्तरावर केंद्रनिहाय खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हयात जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, रावेर, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव येथे प्रत्येकी एक तर जामनेर तालुक्यात जामनेर व शेंदुर्णी येथे दोन असे एकूण 15 खरेदी केंद्र तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या, नंदुरबार यांच्या अभिकर्ता संस्थेतील आदिवासी भागात यावल - 1, रावेर- 1, चोपडा-2 असे एकूण चार याप्रमाणे जिल्ह्यात 19 खरेदीसाठी केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. हे खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्यातील शेतकी सहकारी संघ लि.येथे व बोदवड को. ऑप. सेल परचेस युनि. लि. तसेच शेंदुर्णी सह खरेदी विक्री जिल्हा प्रोसेसिंग सोसायटी लि. येथे त्याचबरोबर यावल येथे हरीपुरा संस्थेचे, रावेर येथे पाल टीडीसी, चोपडा येथे कर्जाणा संस्थेचे व सत्रासेन संस्थेचे येथे सुरु करण्यात येणार आहे.
            अधिक तपशिलासाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
                                                               ०००००

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचा जिल्हादौरा


        जळगाव, दि.31- राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा बुधवार 1 नोव्हेंबर  रोजीचा  दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
            बुधवार 1 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता ठाणे निवासस्थान येथून मोटारीने पाचोरा जि. जळगावकडे प्रयाण. सायं 4 वा. पाचोरा जि. जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. 30 मि.नी ते सायं 6.00 वाजेपर्यंत मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त सदिच्छा भेट व त्यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटन कार्यक्रम. स्थळ :- पाचोरा विधानसभा मतदार संघ. सायं 6.00 वा. पाचोरा येथून मोटारीने ठाणेकडे प्रयाण.
०००००

जिल्ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

             जळगाव, दि. 31- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्ह्यात 10 नोव्हेंबर 2017 पावेतो मनाई आदेश लागू केले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
                                                                        ०००००

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार जिल्हास्तरीय समितीने दिली मंजूरी, जिल्ह्याची दुष्काळमुक्ती वाटचाल

          जळगाव, दि. 31 - जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार आहे. या कामांच्या आराखड्यास आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने दिली मंजूरी दिली आहे. मंजूरी दिलेल्या कामांबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करुन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल निश्चितपणे दुष्काळमुक्तीकडे होईल, असा आशावाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ चे उद्दिष्ट समोर ठेवून डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला.
           राज्यात यावर्षी या अभियानाचा तिसऱ्या टप्प्या सुरु असून या वर्षी जिल्हयातील 206 गावांची निवड करण्यात आला आहे. या वर्षीपासून गावांची निवड केल्यानंतर आराखडयास ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागणार असल्याने  प्रत्येक गावातील 5 व्यक्तींना कृषी विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच गावात शिवार फेरी काढण्यात येवून गावात कोणती कामे करावायाची हे ठरवून त्यास ग्रामसभेची मान्यता घेण्यात आली आहे. या आराखड्यांना तालुकास्तरीय समितीनेही मान्यता दिली आहे. जिल्हयातील 206 गावांनी तयार केलेल्या आराखडयांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. या अभियानातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या लवकरच विविध विभागामार्फत निविदा काढून कामे सुरु करण्यात येणार आहे.
             जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात तालुकानिहाय निवड झालेल्या गावांची संख्या जळगाव तालुका -12 गावे, भुसावाळ- 14, रावेर-7, मुक्ताईनगर-15, बोदवड-15, यावल-7, अमळनेर-16, धरणगाव-11, पारोळा-14, एरंडोल-10, चोपडा-10, पाचोरा-16, भडगाव-12, चाळीसगाव-21, जामनेर तालुका -26 गावे याप्रमाणे 206 गावांची निवड करण्यात आली आहे.
             या गावामध्ये कृषि विभागामार्फत 58 कोटी 94 लाख 55 हजार रुपयांची 3307 कामे, लघुसिंचन (जिल्हा परिषद) विभागामार्फत 49 कोटी 68 लाख 35 हजार रुपयांची 615 कामे, वरीष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागामार्फत 1 कोटी 8 लाख रुपयांची 184 कामे, उम मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभागामार्फत 3 कोटी 66 लाख 35 हजार रुपयांची 1771 कामे, लघुसिंचन (जलसंधारण) विभागामार्फत 4 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची 59 कामे तर वन विभागामार्फत 17 कोटी 64 लाख 46 हजार रुपयांची 422 कामे अशी एकूण 135 कोटी 8 लाख 47 हजार रुपये खर्चाची 6 हजार 358 कामे करण्यात येणार आहे.
            जलयुक्त शिवार अभियानातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये कंपार्टमेंट बंडींग, सी.सी.टी. लूज बोल्डर स्ट्रक्चर, गॅबियन स्ट्रक्चर, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, नवीन सिमेंट नाला बांध, नवीन माती नाला बांध, के. टी. वेअर दुरुस्ती, पाझर तलाव, गाव तलाव  दुरुस्ती, गाळ काढणे, विहिर पुर्नभरण, सलग समतल चर, दगडी बांध, वन बंधारा, जलशोष खड्डे आदि कामांचा समावेश आहे.      
            या बैठकीस उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, लघुसिंचन विभागाचे (जलसंधारण) श्री. नंदनवार, यांचेसह जिल्ह्यातील प्रातांधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
             यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण कामांचाही आढावा घेतला. शेतातील पिके निघाल्यानंतर ही अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पुन्हा सुरु करुन ती मार्चअखेर पूर्ण होतील यादृष्टिने यंत्रणेने नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.
                                                                       000

राष्ट्रीय एकता दिवस आणि राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहिली आदरांजली


               जळगाव, दि. 31 - सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त 'राष्ट्रीय एकता दिवस' आणि स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त 'राष्ट्रीय संकल्प दिन' निमित्ताने आज त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी उपस्थितांना 'राष्ट्रीय एकता दिवस' शपथ दिली.
                याप्रसंगी उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   
                                                                          000

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ दौडमध्ये धावले अवघे जळगावकर जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी एकता दौड ला दाखविली हिरवी झेंडी



     जळगाव, दि. 31 - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ या दौड चा प्रारंभ राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून काव्यरत्नावली चौक येथून करण्यात आला.
            या कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रशीद तडवी, तहसीलदार अमोल निकम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपवनसंरक्षक यावल विभाग, संजय दहिवले, तहसीलदार अमोल निकम, उपसंचालक कृषी अनिल भोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, फारुख शेख आदिसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी  यांनी उपस्थितांना उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.  या दौड मध्ये मंत्री श्री. महाजन यांचेसह सर्व शासकीय अधिकारी, तसेच जैन स्पोटर्स् अकॅडमीचे खेळाडू, रनर ग्रुप चे सदस्य, जिल्हा ॲथेलेटिक्स संघटनेचे सदस्य, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध जिमखान्यांचे खेळाडू, शासकीय कार्यालयांचे कर्मचारी, तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काव्यरत्नावरली चौक येथून सुरु झालेल्या दौड चा समारोप शेवटी जी. ग्राऊंड येथे झाला.
            यावेळी मंत्री महाजन म्हणाले की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे काम केले. आज त्यांच्या नावाने देशभरात ‘रन फॉर युनिटी’ दौड आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकणार नाही. अशा प्रकारचा संदेश या दौड च्या माध्यमातून देण्यात येत आहे.
                                                                            0000

Monday, 30 October 2017

मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करावे · लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करा. - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



             

          जळगाव, दि. 30 - मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे काम यंत्रणांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून समजावे आणि या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी आपले योगदान द्यावे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांचे सर्वेक्षण पूर्ण करुन त्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
            इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आरोग्य सेवा, पुणे चे सहायक संचालक डॉ. आर. एच. आडकेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर यांचेसह जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            जिल्हयात मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या 7 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. इंद्रधनुष्य मोहिमेत जिल्हयाचा समावेश होणे ही भूषणावह बाब नाही असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांचे व गरोदर मातांचे व्यवस्थितपणे सर्व्हेक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेतील सर्वांना आवश्यक ते प्रशिक्षण द्या. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच महिला व बालविकास विभाग यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. विशेषत: झोपडपट्टी भागातील सर्व्हेक्षण वस्तुस्थितीदर्शक असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यंत्रणांनी लाभार्थ्यांना लसीकरणाचे महत्व पटवून देणे आवश्यक असून यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करावी. आवश्यकता असेल तेथे लोकप्रतिनिधींची मदत घेण्याबाबतही त्यांनी सूचित केले. या मोहिमेत लसीकरणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले पाहिजे यासाठी यंत्रणेने आवश्यक ते नियोजन  करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हयाची एकूण लोकसंख्या 37 लाख 39 हजार 689 इतकी आहे. त्यापैकी 28 लाख 87 हजार 206 ग्रामीण तर 8 लाख 82 हजार 483 इतकी शहरी लोकसंख्या आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 9 लाख 6 हजार 230 तर शहरी भागातील 3 लाख 6 हजार 961 इतकी अतिजोखीमग्रस्त भागाची लोकसंख्या आहे. जिल्हयात 0 ते2 वर्षे वयोगटातील बालकांची संख्या 1 लाख 35 हजार 558 इतकी आहे. त्यापैकी 7 हजार 979 लाभार्थी आहेत. तर गरोदर मातांची संख्या 1 हजार 364 इतकी आहे. या सर्वांची लसीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचेही आरोग्य अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.
0000