जळगाव, दि. 13 - आसोदा पाणीपुरवठा योजनेचे अपुरे राहिलेले काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिला.
आसोदा पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक आज राज्यमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसीलदार अमोल निकम यांचेसह पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराचे प्रतिनिधी तसेच आसोदा ग्रामस्थ उपस्थित होते.
आसोदा पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थ सतत पाठपुरावा करीत असून हे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक असून यासाठी कंत्राटदाराने जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना राज्यमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या. या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून मोटार बसविण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच एक पाण्याची टाकी पूर्ण झाली आहे तर दुस-या टाकीचे काम सुरु असून 31 डिसेंबर पर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती कंत्राटदाराच्या प्रतिनिधीनी बैठकीत दिली.
ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होवू नये यासाठी या पाणीपुरवठा योजनेचे कामाला गती येणे आवश्यक आहे. यासाठी कंत्राटदारासोबत बैठक घेणे आवश्यक आहे. असे सांगून येत्या 30 तारखेला स्वत: कंत्राटदाराने बैठकीस उपस्थित रहावे, अन्यथा त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिला.
या बैठकीत आसोदा शिवारातील आरक्षणा संदर्भात भूसंपादनाच्या विषयावरही चर्चा झाली.
000
No comments:
Post a Comment