Monday, 30 October 2017

मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करावे · लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करा. - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



             

          जळगाव, दि. 30 - मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे काम यंत्रणांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून समजावे आणि या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी आपले योगदान द्यावे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांचे सर्वेक्षण पूर्ण करुन त्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
            इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आरोग्य सेवा, पुणे चे सहायक संचालक डॉ. आर. एच. आडकेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर यांचेसह जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            जिल्हयात मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या 7 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. इंद्रधनुष्य मोहिमेत जिल्हयाचा समावेश होणे ही भूषणावह बाब नाही असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांचे व गरोदर मातांचे व्यवस्थितपणे सर्व्हेक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेतील सर्वांना आवश्यक ते प्रशिक्षण द्या. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच महिला व बालविकास विभाग यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. विशेषत: झोपडपट्टी भागातील सर्व्हेक्षण वस्तुस्थितीदर्शक असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यंत्रणांनी लाभार्थ्यांना लसीकरणाचे महत्व पटवून देणे आवश्यक असून यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करावी. आवश्यकता असेल तेथे लोकप्रतिनिधींची मदत घेण्याबाबतही त्यांनी सूचित केले. या मोहिमेत लसीकरणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले पाहिजे यासाठी यंत्रणेने आवश्यक ते नियोजन  करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हयाची एकूण लोकसंख्या 37 लाख 39 हजार 689 इतकी आहे. त्यापैकी 28 लाख 87 हजार 206 ग्रामीण तर 8 लाख 82 हजार 483 इतकी शहरी लोकसंख्या आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 9 लाख 6 हजार 230 तर शहरी भागातील 3 लाख 6 हजार 961 इतकी अतिजोखीमग्रस्त भागाची लोकसंख्या आहे. जिल्हयात 0 ते2 वर्षे वयोगटातील बालकांची संख्या 1 लाख 35 हजार 558 इतकी आहे. त्यापैकी 7 हजार 979 लाभार्थी आहेत. तर गरोदर मातांची संख्या 1 हजार 364 इतकी आहे. या सर्वांची लसीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचेही आरोग्य अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.
0000

No comments:

Post a Comment