Monday, 30 October 2017

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा जिल्ह्यातील 22 हजार 442 शेतकऱ्यांनी घेतला लाभ



·       जिल्हयातील 24 हजार 904 हेक्टर क्षेत्र आले सिंचनाखाली
·       86 कोटी 4 लाख रुपयांचा निधी खर्च

    जळगाव, दि. 30 - प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतंर्गत जिल्ह्यातील 22 हजार 750 शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेचा लाभ मिळाला असून या योजनेमुळे जिल्हयातील 24 हजार 904 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यासाठी शासनाने 86 कोटी 4 लाख 28 हजार रुपयांचा निधी खर्च केला असून याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी होत आहे
            शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने’ चा समावेश केला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतास पाण्याची उपलब्ध व्हावे. आणि त्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.
            प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात सन 2014-15 मध्ये ठिबक सिंचनातंर्गत 9 हजार 114 शेतकऱ्यांना तर तुषार सिंचनातंर्गत 231 शेतकऱ्यांना असे एकूण 9 हजार 345 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. ठिबक सिंचनामुळे यावर्षी जिल्ह्यातील 10 हजार 840 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ठिबक सिंचनासाठी शासनाने 35 कोटी 68 लाख तर तुषार सिंचनासाठी  38 लाख 79  हजार असे एकूण 36 कोटी 6 लाख 79 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
            त्याचप्रमाणे 2015-16 मध्ये ठिबक सिंचनातंर्गत 3 हजार 106 शेतकरी तर तुषार सिंचनातंर्गत 427  शेतकरी असे एकूण 3 हजार 533 शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत लाभ देण्यात आला आहे. ठिबक सिंचनामुळे 3 हजार 419 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले तर तुषार सिंचनामुळे 305 हेक्टर असे एकूण 3 हजार 724 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यावर्षी ठिंबक सिंचनासाठी 11 कोटी 34 लाख तर तुषार सिंचनासाठी 83 लाख असे एकूण 12 कोटी 17 लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.
            तसेच सन 2016-17 मध्ये ठिबक सिंचनातंर्गत 9 हजार 145 शेतकरी तर तुषार सिंचनातंर्गत 419 शेतकरी असे एकूण 9 हजार 564 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ठिबक सिंचनामुळे यावर्षी 10 हजार 645 हेक्टर क्षेत्र तर तुषार सिंचनामुळे 290 हेक्टर क्षेत्र असे एकूण 10 हजार 936 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ठिबक सिंचनासाठी 37 कोटी 2 लाख तर तुषार सिंचनासाठी 78लाख 49 हजार रुपये असे एकूण 37 कोटी 80 लाख 49 हजार रुपयांचा निधी  यावर्षी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
योजनेची उद्दिष्ट्ये-
            आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
योजनेत अंतर्भूत घटक -
            ठिबक सिंचन या सिंचन प्रकारात  इन लाईन, ऑन लाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस इत्यादी घटक अंतर्भूत असून तुषार सिंचन प्रकारात मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन हे घटक अंतर्भूत आहेत.
अनुदान मर्यादा -
            सन 2017- 18 या वर्षासाठी सूक्ष्म सिंचनातंर्गत विविध क्षेत्र व घटकांसाठी शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीनुसार अनुदानाची मर्यादा ही अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55 टक्के, सर्वसाधारण भूधारक शेतकऱ्यांसाठी 45 टक्के आहे इतकी आहे.
            या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी शाश्वत पाणी मिळण्यास मदत होणार  असल्याने त्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होत आहे.
                                                             ०००००

No comments:

Post a Comment