Wednesday, 18 October 2017

जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्तीस ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रारंभ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची दिवाळी भेट












              जिल्हयातील 30 शेतक-यांचा बेबाक प्रमाणपत्र, साडी, चोळी व पोशाख देऊन करण्यात आला सन्मान
शेतीला शाश्वत वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द
                                                           -  जलसंपदामंत्री गिरीष महाजन
            जळगाव, दि. 18 - येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्र्यांच्या संकल्पाला अनुसरुन राज्यात शेतीला शाश्वत वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढण्यासाठी सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आहे. अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष  महाजन यांनी दिली.
ऐतिहासिक अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेतंर्गत शेतकरी कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हयातील 30 शेतक-यांचा राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते कर्जमुक्ती प्रमाणपत्र, साडी, चोळी व पोशाख देवून येथील जिल्हा नियोजन सभागृहात सन्मान करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार स्मिताताई वाघ, आमदार सर्वश्री. चंदुभाई पटेल, सुरेश भोळे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना. महाजन म्हणाले की, पूर्वीच्या काळी निसर्गाच्या पाऊसावर शेती केली जात होती. पंरतु आता निसर्गावर अवलंबून शेती करण्याचे दिवस राहिले नाही. शेतीला शाश्वत वीज व पाणी असेल तरच शेती करता येते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. यासाठी शाश्वत सिंचनाची सुविधा वाढविण्यात येत असून यासाठी जलयुक्त शिवार, गाळमुक्त्‍ धरण व गाळयुक्त शिवार यासारख्या महत्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब  न थेब अडविण्यात येत आहे. याचे दृष्य परिणाम आता दिसायला लागले असून जलयुक्तच्या कामांमुळे गावांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी शासन कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करण्याला प्राधान्य देत आहे. या उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालावर त्याचठिकाणी प्रक्रिया झाल्यास त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार असून त्यांच्या मालाला भाव मिळण्यास मदत होणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीची वेळच येवू नये यासाठी राज्य शासन शेती क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक करीत असून या गुंतवणूकीच्या माध्यमातून येत्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास निश्चितच मदत होईल असा आशावादही ना. महाजन यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही ऐतिहासिक असून कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर या कर्जमाफी योजनेपासून राज्यातील कुणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. यासाठी काही कालावधी लागला असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यास कर्जमाफीचा लाभ मिळणारच असे सांगून ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही खऱ्याअर्थाने शासनाची दिवाळी भेट असल्याचेही ना. महाजन यांनी यावेळी सांगितले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील 77 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले. त्यापैकी 55 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्याला सक्षमपणे उभा करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु असून या कर्जमाफी योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही असे सांगून ते म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलसंपदामंत्री ना.महाजन यांनी निम्नतापी प्रकल्पास मंजूरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठया प्रमाणात मदत होणार आहे. शेतकऱ्यांना वीज आणि पाणी उपलब्ध करुन दिल्यास यापुढे कधीही कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही. यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांवरच देशाचे व राज्याचे भवितव्य अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी संघर्ष करावा. मात्र आत्महत्येचा विचार करु नये. शासन आणि प्रशासन आपल्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यासाठी जिल्हयात 941 कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केले होते. जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडलाख अर्जांची छपाई करुन त्याचे शेतकऱ्यांना वाटप केले. जिल्हयातील 867 विविध कार्यकारी सोसायटींच्यामार्फत 2 लाख 66 हजार 346 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची रक्कम मिळावी यासाठी जिल्हयातील 1501 महसुली गावांमध्ये कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन करण्यात आले असून यासाठी प्रशासनातील सर्व विभागांची मदत झाल्याचेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अतंर्गत
बेबाक प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलेले शेतकरी
श्री. संजय मिठाराम महाजन, धरणगांव, श्री. संजय रामदास माळी, पाळधी, ता. धरणगांव
श्री. प्रल्हाद पुडलिक पाटील, टाकरखेडे, श्री. अनिल रामकृष्ण पाटील, नाचणखेडा, ता.जामनेर
श्री. प्रभाकर नारायण राणे, कोथळी, श्री. दामु संपत बेलदार, मुक्ताईनगर, ता.मुक्ताईनगर
श्री. नाना रामदास जाधव, पाथरी, श्री. नटराज दत्तात्रय धुमाळ, चिंचोली, ता.जळगांव
श्री. प्रल्हाद अर्जुन कोळी, साकेगांव, श्री. सुनिता भगवान चौधरी, अंजनसोंडे, ता.भुसावळ
श्री. पंडीत नारायण धनगर,  मुंजलवाडी, श्री. सुपडु शोभाराम पाटील, मुंजलवाडी, ता.रावेर
श्री. अशोक देवराम महाजन, भालोद, श्री. रमेश नामदेव पाटील, हिंगोणा, ता.यावल
श्री. मारूती गोंविद वराडे, एनगांव, श्री. प्रभाकर संतोष खराटे, हरणेखेडे, ता. बोदवड
श्री. अनिल सुपडु तडवी, लोहारा, श्री. राहुल धनाराज पाटील, अंतुर्ली खुर्द, ता.पाचोरा
श्री. सर्जेराव भास्कर पाटील, बामरूद बु., श्री. भगवान आनंदा पाटील, आमळदे, ता.भडगांव
श्रीमती.बालाबाई सखाराम जाधव, खडकी बु, श्री. वाल्मीक देवराम नागरे, रोहीणी, ता.चाळीसगांव
श्री. अशोक सखाराम महाजन, सिरसोडे, श्री. सुभाष शामराव पाटील, देवगांव, ता.पारोळा
श्री. शांताराम चिंतामण पाटील, ढेकुसिम, श्री. जवाहरलाल राघो पारधी सडावण बु, ता.अमळनेर
श्रीमती सुशिलाबाई बाजीराव कोळी,विटनेर, श्री. सुभाष गोविंदा अलकारी, चोपडा, ता.चोपडा
श्री. रामदास नथ्थु सोनवणे, खेडी खुर्द, श्री. साहेबराव साधु मराठे, खर्ची बु, ता.एरंडोल
            कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील 30 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र, साडी, चोळी व पोशाख देऊन सन्मान करण्यात आला.
लोकराज्य वाचनीय मासिक,
शासकीय योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य प्रत्येकाने वाचले पाहिजे
                                                                    - ना. गिरीष महाजन
            महाराष्ट्र शासनाचे मुख्यपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या ऑक्टोबर 2017 च्या अंकाचे प्रकाशन ना. गिरीष महाजन, ना. गुलाबराव पाटील, आमदार चंदूभाई पटेल, सुरेश भोळे,‍ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते येथील नियोजन भवनात करण्यात आले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनाच्या तीनवर्ष पूर्तीनिमित्त हा अंक प्रसिध्द केला आहे. या अंकात राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा उल्लेख असून शासनाच्या योजनांची माहिती व महत्वाच्या शासन निर्णयांची माहिती या अंकात प्रसिध्द करण्यात आली आहे. हा अंक अतिशय वाचनीय असून प्रत्येकाने लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे व हा अंक वाचावा असे आवाहन ना. महाजन यांनी उपस्थितांना केले.
ना. महाजन यांनी दिली शेतकऱ्यांना मिठाईची भेट
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी कर्जमुक्त्‍ शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई भेट दिली.
पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याचे ना. महाजन व ना. पाटील यांचे आवाहन
            दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने हा सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही. फटाक्यांमुळे प्रदुषण होणार नाही. तसेच स्वच्छता राहिल अशापध्दतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ना. महाजन व ना. पाटील यांनी जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना केले.
जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिंबधकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
            जिल्हयात शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर यांचा ना. महाजन व ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी तसेच विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील शेतकरी कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभु पाटील यांनी तर  उपस्थितांचे आभार जिल्हा उपनिंबधक श्री. जाधवर यांनी मानले.
000

No comments:

Post a Comment