जळगाव,
दि. 2 :- ग्रामीण भागातील पहिले पंडित
दिनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिर आज फैजपूर येथे संपन्न झाले. या
शिबिराचा जिल्हयाच्या ग्रामीण भागातील लाखो रुग्णांनी लाभ घेतला. आज सकाळपासूनच
जिल्हयाच्या रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर या आदिवासी बहुल तालुक्यांसह इतर
भागातून पूर्व तपासणी केलेले रुग्ण शिबिरस्थळी
वाहनांनी येत होते. शिबिराच्या ठिकाणी आजारानुसार तपासणी कक्ष सुरु करण्यात
आले होते. याठिकाणी पूर्व तपासणी केलेले रुग्ण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आदि
मोठया शहरांतून आलेल्या उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेत होते.
राज्याचे
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि आमदार हरिभाऊ जावळे
आयोजक असलेल्या ग्रामीण भागातील पहिल्याच या महाआरोग्य शिबिरात नागरीकांनी आपली
तपासणी करुन घेण्यासाठी मोठया संख्येने गर्दी केली होती.
या
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते
दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश
महाजन, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार
रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार व शिबिराचे आयोजक
हरिभाऊ जावळे, महापौर ललित कोल्हे, आमदार सर्वश्री. बाळासाहेब सानप, प्रशांत बंग,
राजेंद्र पटणी, संजय सावकारे, सुरेश भोळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय
देशमुख, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे,
माजीमंत्री सुरेश जैन, माजी आमदार शिरिषदादा चौधरी, आरोग्यदूत रामेश्वर नाईक,
महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज, सुरेश शास्त्री, आरोग्यभारतीचे सुनिल जोशी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक
जैन, विक्रमसिंग राजपूत, डॉ. निर्मल सुर्या, डॉ. सचिन लोहिया, यांचेसह विविध शहरांमधून आलेले तज्ज्ञ डॉक्टर
मोठया संख्येने उपस्थित होते.
आरोग्यदूत
रामेश्वर नाईक यांनी महाआरोग्य शिबीराच्या आयोजनामागील भूमिका सांगतांना यापूर्वी
रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे यासारख्या मोठया शहरांमध्ये घेऊन जावे लागत
होते. परंतु वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या विभागाचा कार्यभार
घेतल्यापासून रुग्णांना त्वरीत उपचार मिळण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे
सांगितल्याने तसेच या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर याचठिकाणी उपचार व्हावेत
अशी संकल्पना मांडल्याने हे शिबिर ग्रामीण भागात आयोजित आणि तेही फैजपूरसारख्या
ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी घेण्याचे निश्चित केले. रुग्णांवर त्वरीत उपचार व
त्यांना वेळेत औषधी मिळावीत या भावनेने हे
शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज
भासल्यास त्यांची ने-आण करण्यापासून तर इतर सर्व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे.
यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टर तसेच स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत.
या
शिबिरात जिल्हयासह राज्यातील विविध शहरांमधून
आलेले 2500 डॉक्टर मोफत तपासणी करीत आहेत. तसेच रुग्णांना 146 प्रकारची
औषधी मोफत देण्यात येत आहे. या शिबिरात रुग्णांची नेत्ररोग, हद्यरोग, त्वचारोग,
अस्थिरोग, दंतचिकित्सा आदि रोगांची तपासणी करुन त्यावर उपचार करण्यात आले.
या
शिबीरात येणाऱ्या रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी 6 ठिकाणी
चौकशी कक्ष, पुरुषांसाठी 5 व महिलांसाठी 5 प्रसाधन गृह, अग्निशमनच्या
चारही बाजूंनी चार गाड्या, 15 हजार स्वयंसेवक, नर्स, आरोग्य, महसुल, पोलीस
विभागाच्या यंत्रणेने मोठया प्रमाणात सहकार्य केले.
या
शिबीरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांवर रावेर व भुसावळ याठिकाणी लगेचच छोट्या
शस्त्रक्रियेला करण्यात येणार आहे. तर मोठ्या शस्त्रक्रियेसाठी स्टिकर देण्यात
येणार असून रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर
प्रवास भाड्याचा खर्च मायलॉन कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. या शिबीरात
रुग्णांसाठी जेवण, चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या
शिबिरात एम.आर.आय., सिटी स्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी, ई.सी.जी. तसेच
रक्तासंदर्भातील सर्व चाचण्या करण्यासाठी
यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांच्या त्याचठिकाणी तपसण्या
करण्यात येत होत्या. अत्यावश्यक सेवेसाठी
200 डॉक्टरांची स्वतंत्र टीम ठेवण्यात आली होती. 26 ऍम्ब्युलन्स व्हॅन,
वाहनांची गर्दी टाळण्यासाठी 4 ठिकाणी पार्किंग व्यवस्था, 5 ठिकाणी प्रवेशद्वार,
ऍलोपॅथी, 6 दंत चिकित्सा व्हॅन, 5 ठिकाणी मोफत औषधींचे स्टॉल लावण्यात आले होते.
स्त्रियांचे आजार, कर्करोग यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर अपंगांसाठी
पार्किंगजवळच ओपीडी, स्ट्रेचर व औषधांची सुविधाउललब्ध करुन देण्यात आली होती. या शिबिरात
आलेल्या शेवटच्या रुग्णाची तपासणी होईपर्यंत शिबीर सुरु राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ग्रामीण भागात होणारे
पहिलेच महाआरोग्य शिबीर असल्याने पितांबर पवार, अरविंद देशमुख यांचेसह चोपडा,
पारोळा, अमळनेर, यावल, वरणगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर या परिसरातील
नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडल्याने तसेच या भागातील सर्व शासकीय
यंत्रणांनी रुग्ण शोधण्यापासून तर त्यांना शिबिरस्थळी आणण्यापर्यत सर्व मदत
केल्याने या शिबिराची एक ऐतिहासिक शिबिर म्हणून नोंद झाली आहे.
०००००
No comments:
Post a Comment