Thursday, 16 November 2017

जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम विश्वासार्हता जपणे हेच माध्यमांसमोरील प्रमूख आव्हान राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रातील मान्यवरांचा सूर



       







        जळगाव, दि. 16 - माध्यम ही समाजाची आरसा असल्याने सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून, नैतिकमुल्यांची जोपासना करुन विश्वासार्हता जपणे हेच माध्यमांसमोरील महत्वाचे आव्हान असल्याचे विचार आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
            राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात भाग घेताना मान्यवरांनी वरील विचार मांडले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे हे उपस्थित होते.
            वृत्तपत्रांसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, दिव्य मराठीचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे, सकाळचे संपादक विजय बुवा, दैनिक जनशक्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, मी मराठी चे प्रतिनिधी संतोष सोनवणे आदिंनी सहभाग घेतला.
            यावेळी वृत्तपत्रांसमोरील (प्रिंट मिडीया) आव्हाने यावर बोलतांना मिलींद कुलकर्णी म्हणाले की, वर्तमानपत्रे हे समाजमनाचा आरसा असल्याने बातमीत वास्तवतेला महत्व देणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ बातम्याच समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.
            त्र्यंबक कापडे म्हणाले की, आजकाल बहुतेक वाचक हे सोशल मिडीयावर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवतात. परंतु लोकशाहीत बातम्यांच्या विश्वासार्हतेवर पुढील काळ अवलंबून असल्याने विश्वासार्हतेबरोबरच नैतिकमूल्य जोपासणे हे माध्यमासमोरील मोठे आव्हान आहे.
            विजय बुवा म्हणाले की, वृत्तपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाही समृध्द करण्यामागे वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. लोकांचा विश्वास हा माध्यमांवर असल्याने आपली सद्सदविवेकबृध्दी जागृत ठेवणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आजकाल सर्वांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आपले विचार मांडता येतात. परंतु सोशल मिडीया हाताळण्याचे तंत्रज्ञानही अवगत करणे आवश्यक आहे.
            सोशल मिडीयावरील आव्हाने यावर बोलताना शेखर पाटील म्हणाले की, सोशल मिडीयावर पत्रकारीता करणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करुन घ्यावी. ते हाताळण्याचे तंत्रज्ञान अवगत करावे. त्याचे फायदे तोटे समजून घेऊनच त्याचा वापर करावा. कारण सोशल मिडीयावर टाकलेली पोस्ट सेंकदात जगभर पोहचते. त्यामुळे आपली सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून पोस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
            सोशल मिडीयावर पोस्ट टाकताना आपली भाषा शुध्द असली पाहिजे त्याचबरोबर पोस्ट ही कमी शब्दात मांडता आली पाहिजे. तसेच येणाऱ्या पोस्टची शहानिशा करुनच व तीची सत्यता पडताळूनच पुढे पाठविण्याची काळजी घेण्याचे आवाहन दिलीप तिवारी यांनी केले.
            इलेक्ट्रॉनिक्स माध्यमासमोरील आव्हानांवर बोलतांना संतोष सोनवणे म्हणाले की, या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी आधुनिकतेची कास धरणे आवश्यक आहे तरच आपण टिकून राहू शकतो. अन्यथा आपण प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भिती असल्याने स्वत:ला सतत अपडेट ठेवावे.
            चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपाप्रंसगी प्राचार्य डॉ राणे म्हणाले की, माध्यमे ही समाजप्रबोधनाबरोबरच समाज जागृतीचेही काम करीत असल्याने माध्यमांकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोण बदलता कामा नये यासाठी सर्वांनी सामाजिक भावना जागृत ठेवून संवेदनशीलतेने काम करावे.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली.
            चर्चासत्राची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या चर्चासत्रास प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, मास मिडीया व वृत्तपत्र शाखेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार बेंडाळे महाविद्यालयाच्या मास मिडीया विभागाचे प्रमुख प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ‍विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना उत्तरे देऊन त्यांचेशी संवाद साधला.                                              000

No comments:

Post a Comment