Monday, 6 November 2017

ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत एक महिन्यात स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर






     जळगाव, दि. 6 - जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत येत्या एक महिन्याच्या आत सहकार विभागाचे अधिकारी व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज लोकशाही दिनी ठेवीदारांना दिले.
     जिल्हास्तरीय लोकशाही दिन येथील नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्ह्यातील ठेवीदार व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले की, सध्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे शेतकरी कर्जमाफीचे काम सुरु आहे, ते काम लवकरच संपेल. त्यानंतर सहकार विभागाचे अधिकारी व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. या बैठकीत ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यासाठी एक निश्चित धोरण ठरविण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई
     लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करुन तक्रारदारास न्याय द्यावा, अन्यथा संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल. असा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
     या लोकशाही दिनास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) रशीद तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विवेक सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत बी. ए. बोटे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर, योगेश पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आजच्या लोकशाही दिनात विविध विभागांविषयी एकूण 180 अर्ज प्राप्त झाले आहेत.
०००००

No comments:

Post a Comment