Monday, 20 November 2017

जलयुक्त शिवार मोहिमेअंतर्गत पत्रकार पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन



जळगाव, दि.20 : जलयुक्त शिवार अभियानात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत वस्तुनिष्ठ प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांकडून 27 नोव्हेंबर 2017 पर्यंत पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांसाठी दोन स्वतंत्र गटात स्पर्धा होईल.
अभियानाच्या अनुषंगाने स्वत:च्या उत्कृष्ट लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांची उत्कृष्ट वृत्तचित्रकथा पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
            वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वांपर्यत पोहोचविणे आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या-त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहन देऊन पाणी प्रश्न सोडविण्यास मदत करणाऱ्या पत्रकारांचे साहित्य यासाठी विचारात घेण्यात येणार आहे.
राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये,  द्वितीय पुरस्कार 71 हजार रुपये, तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये आहे. विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये,  द्वितीय पुरस्कार 35 हजार रुपये, तृतीय पुरस्कार 25 हजार रुपये आहे. जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या तीन पुरस्कारांमध्ये प्रथम पुरस्कार रुपये 31 हजार, द्वितीय पुरस्कार 21 हजार आणि तृतीय पुरस्कार 15 हजार रुपये आहे.
इलेक्ट्रॉनिक मिडीया पत्रकारांसाठी राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार 1 लाख  रुपये,  द्वितीय पुरस्कार 71 हजार रुपये, तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये आहे.
            इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव मूळ कात्रणांसह तीन प्रतीत संपादकांमार्फत 27 नोव्हेंबर, 2017 पर्यंत सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. तीन, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव या पत्त्यावर पाठवावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment