Saturday, 25 November 2017

पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत 210 रुग्णांना मिळाली दृष्टि दृ‍ष्टि मिळालेल्या रुग्णांनी टाळ्यांच्या कडकडाटात मानले मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आभार





            जळगाव, दि. 25 - मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत पहिल्या टप्प्यात 210 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्यांना आज घरी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे या रुग्णांना आता नवी दृष्टि मिळाली असून यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या आनंदाबद्दल दृष्टि मिळालेल्या अबालवृध्दांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन आणि पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सर्व टीमचे टाळ्यांचा कडकडाट आभार मानले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्ट 2019 पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचेवर सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मंत्री महाजन यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरातंर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाची सुरुवात नुकतीच (23 नोव्हेंबर रोजी) जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे केली. या अभियानातंर्गत पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते.
            ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या टिमने या रुग्णांची तपासणी करुन तातडीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या 210 रुग्णांवर काल (24 नोव्हेंबर) शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टॉफ यांचेही सहकार्य लाभले.
            शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांची आज तपासणी करुन त्यांना घरी पाठविण्याचा छोटेखानी कार्यक्रम येथील जिल्हा सामान्य रुगणालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचेसह या शस्त्रक्रिया शिबिरासाठी मुंबई येथून आलेले वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी डॉ. लहाने यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधताना शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी घ्यावयाची काळजी, आहार, औषधोपचार याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हाधिकारी यांनी आपले जीवन आपल्याच हातात असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
            या शिबिरात दोन हजारपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यांचेवर येत्या 3 डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  शिबिरासाठी आलेल्या सर्व रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जैन एरिगेशन यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शिबिराच्या आयोजनासाठी लागणाऱ्या विविध सुविधांकरीता एल. के. फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभत आहे. शस्त्रक्रिया झालेल्यांनी पुन्हा तपासणीसाठी 2 डिसेंबर रोजी उपस्थित रहावे. तसेच आवश्यकता भासल्यास या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले.
            मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत आयोजित करण्यात आलेले शिबिर यशस्वी करण्यासाठी जी. एम. फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, पितांबर भावसार व अरविंद देशमुख्य यांची टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे.   या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पितांबर भावसार यांनी तर उपस्थितांचे आभार अरविंद देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा समान्य रुगणालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment