जळगाव, दि. 10 - ग्राहकांची
फसवणूक होवू नये यासाठी त्यांचेमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहकांना
त्यांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव झाल्यास त्यांची फसवणूक होणार नाही. ही बाब
लक्षात घेऊन ग्राहक हक्क संरक्षण समितीने ग्राहकांमध्ये प्रबोधन करावे. असे आवाहन
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
जिल्हा
ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव,
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एम. डी. शहा, अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस.
देवरे यांचेसह ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की,
ग्राहक जागृत झाले तर त्यांची फसवणूक होणार नाही यासाठी परिषदेच्या
सदस्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. त्याचबरोबर परिषदेच्या सदस्यांनाही आपल्याला असलेल्या
अधिकारानुसारच कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी अशासकीय सदस्यांना दिल्यात.
या बैठकीत पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी तक्रार पुस्तक
ठेवण्यात यावे. पंपावर शौचालय व पिण्याचे पाण्याची व्यवस्था असावी. हॉटेलमधील
खाद्यपदार्थात भेसळ होवू नये यासाठी संबंधीत विभागाने काळजी घ्यावी, पिंप्राळा
येथील रेल्वेगेट चुकीचे दुरुस्त करण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
रेल्वे तिकीटाच्या पैशात सर्व सोयींचा समावेश असतांना पुन्हा लघुशंकेसाठी वेगळे
पैसे आकारणे चुकीचे आहे. ग्रामीण भागातील आपलं सरकार सेवा केंद्रे आदि मुद्यांवर
चर्चा करण्यात आली. रेल्वे गेटची पाहणी रेल्वे प्रशासनाने करावी यासाठी त्यांना
पत्र देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. समितीच्या तिमाही बैठका घेण्याचे
निर्देशही जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले.
0000
No comments:
Post a Comment