जळगाव, दि. 13 - पाणी हेच जीवन आहे ही बाब
ओळखून जळगाव ग्रामीण भागातील नागरीकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी
प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी
केले. बिलवाडी, ता. जळगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन त्यांच्या
हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
बिलवाडी
गावास म्हसावद येथून पाईप लाईनव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.
यापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या खुपच जीर्ण झाल्याने त्यामुळे पाण्याची
साठवणूक व पुरवठा योग्य पध्दतीने होत नव्हता. बिलवाडी गावाच्या लोकसंख्येचा विचार
करुन तसेच तेथील वाढती लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी
वारंवार गावक-यांनी केली होती. या मागणीचा सारासार विचार करुन बिलवाडी ता. जळगाव
येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत 60 हजार लिटर क्षमतेच्या पिण्याचे पाण्याच्या
टाकीचे काम मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये टाकीचे बांधकाम, अंतर्गत पाईपलाईन व
स्विचरुम या कामांचा समावेश आहे. यासाठी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात
आल्याची माहिती राज्यमंत्री ना. पाटील यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर म्हसावद-बोरनार
जिल्हा परिषद गटातील कुरकुटनाल्यावर बंधारा बांधण्याचा प्रस्ताव सुध्दा लवकरच
मार्गी लागणार असून गावातील युवकांसाठी व्यायाम शाळा सुरु करणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पवन
सोनवणे, पंचायत समिती सदस्य नंदु पाटील, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर महाराज
जळकेकर, नरेंद्रभाऊ सोनवणे, सांगिताताई चिंचोरे, निर्मलताई कोळी, रमेश पाटील, माजी
प.स. सभापती धोंडू जगताप, बिलवाडीच्या सरपंच श्रीमती निर्मलताई भिल, ग्रामपंचायत
सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य, यांचेसह परिसरातील ग्रामस्थ मोठया
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन संदिप पाटील तर आभार प्रदर्शन धोंडूभाऊ जगताप यांनी केले.
०००००
No comments:
Post a Comment