Thursday, 30 November 2017

नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाकडून कसोशीचे प्रयत्न सुरु - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

         चाळीसगाव, दि. 30 :- तालुक्यातील वरखेडे येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी वनविभागाच्या वतीने कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. लवकरच बिबटया जेरबंद करण्यात येईल अशी माहिती राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
         तालुक्यातील वरखेडे येथे नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते.  या पत्रकार परिषदेस जळगावचे उप वनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, विविध स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
       श्री. पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतात काम करता यावे यासाठी दिवसा होणारे लोडशेडींग बंद करण्यात आले आहे. बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या बकऱ्या पिंजऱ्यात न ठेवता त्या बिबट्या ज्या भागात असण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी ठेवाव्यात. जेणेकरुन बिबटयाचा माग काढणे सोपे होईल  असे विविध उपाय  त्यांनी सुचविले. विविध कारणांमुळे शेतकरी संकटात असताना आत बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतातील माल काढून बाजारात विकता येत नाही यामुळे शेतकरी अडचणीत आहे. बिबट्याच्या उपद्रवापासून नागरीकांची लवकर मुक्तता होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतही त्यांनी वनविभागाला सुचना दिल्यात.
          तत्पूर्वी वरखेडे येथील दीपाली नारायण जगताप, सुशाबाई धना माळी (भिल), यमुनाबाई बापदला तिरमली या महिला बिबट्याच्या हल्यात मृत्यु पावल्याने राज्यमंत्री गुलाबराव पाटील  यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटंबियांचे सात्वंन केले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींचे प्राण आपण परत आणू शकत नाही. परंतू त्यांच्या कुटुंबियांना शक्य ती मदत शासनाकडून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment