Thursday, 9 November 2017

टंचाई सदृश्य परिस्थितीचे सर्व्हेक्षण 30 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील





·         जिल्हयातील 859 गावांचा 1574 उपाययोजनांसाठी 30 कोटी रुपयांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार
        जळगाव, दि. 9 - जिल्हयातील संभाव्य टंचाईस्थिती व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी जिल्हयातील टंचाई सदृश्य परिस्थतीचे सर्व्हेक्षण 30 नोव्हेबर पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महसूल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी दिल्या.
         जिल्हयातील मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षण व पाणी टंचाई परिस्थिती व त्यावरील उपाययोजनांची आढावा बैठक येथील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.
        यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हयात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता या परिस्थितीचे सर्व्हेक्षण व्यवस्थित होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणेने योगय काळजी घेऊन हे सर्व्हेक्षण करावे. सर्व्हेक्षण करतांना वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवूनच काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. जिल्हयात वारंवार उद्भवणारी पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता नदीजोड प्रकल्पाची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली. याबाबत नदीजोड प्रकल्पाचे जे लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले होते ते बंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिले. त्यावर स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्याचबरोबर जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील जी कामे तातडीने होणे आवश्यक आहे. त्या कामांची यादी तयार करुन तसेच या कामांची आवश्यकता आदि बाबींचे सादरीकरण करावे. जेणेकरुन ही कामे तातडीने मंजूर करुन पूर्ण करण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न करणे सोईचे होईल. असेही पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना सांगितले.
        जिल्हयातील यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने आजमितीस 34 गावामध्ये 17 टँकर सुरु असून 42 गावांमध्ये 42 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याचबरोबरच जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता 859 गावांमध्ये 1574 उपाययोजना करण्यासाठी 29 कोटी 50 लाख 44 हजार रुपयांचा संभाव्य आराखडा करण्यात आला आहे. यामध्ये गाळ काढणे, विहिर खोल करणे, शेवडया घेणे, बुडक्या घेणे, खाजगी विहिर अधिग्रहण, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नविन विंधन विहिर, कूपनलिका, नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पाणी पुरवठा योजना, विंधन विहिर विशेष दुरुस्ती आदि कामांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. या संभाव्य आराखडयास बैठकीत मंजूरी देण्यात आली.
        जिल्हयात पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू नये यासाठी धरणगाव नगरपालिकेसाठी गुळ धरणातून 100 हतनुर धरणातून 150 दलघफु, चोपडा नगरपालिकेसाठी गुळ धरणातून 250 दलघफु तर अमळनेर नगरपालिकेसाठी हतनुर धरणातून 560 दलघफु पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हयातील गिरणा, मन्याड, बोरी,भोकरबारी, अंजनी, हतनुर, सुकी, अग्नावती, तोंडापूर,हिवरा, बहुळा, गुळ आणि वाघूर धरणातून विविध पाणीपुरवठा संस्थासाठी पिण्याचे पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
            शेतकरी कर्जमाफीबाबत जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाबाबत माहिती देताना पालकमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 लाख 2 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम रुपये 3 हजार 400 कोटी त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बॅकाकडे देण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम रुपये 306 कोटी शेतकऱ्यांच्या नावार जमा करण्यासाठी बँकाकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कृषि संजीवनी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी वीजवितरण कंपनीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे.
            या बैठकीस आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सर्वश्री. चंदूभाई पटेल, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, संजय सावकारे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, सतिष पाटील, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, जितेंद्र पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचलन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी केले.
000

No comments:

Post a Comment