Thursday, 31 January 2019

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


        जळगाव, दि. 31 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
            शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9.30  वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव जि. जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी. दुपारी 1.30 वाजता आशा महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ :- कांताई सभागृह जळगाव), दुपारी 4.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.  
000

धुळे येथे 4 फेब्रुवारी रोजी वायूदलासाठी भरती मेळाव्याचे आयोजन नंदूरबार, धुळे, जळगावसह राज्यातील 21 जिल्ह्यातील तरुणांना भरतीची संधी


            धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) - भारतीय वायू सेनेतील एअरमन पदाच्या भरतीसाठी एअरमेन सिलेक्शन सेंटर, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे सोमवार दि. 4 फेब्रुवारी, 2019 रोजी राज्य राखीव पोलिस दल मैदान, सुरत बायपास, साक्री रोड, धुळे येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे.
            या भरती मेळाव्यासाठी पात्र उमेदवाराची जन्मतारीख 19 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2003 या कालावधीतील असावी. शैक्षणिक पात्रता : उमेदवार बारावीत कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असावा, इंग्रजीत किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. सरासरी 50 टक्के गुण असावेत. उंची- 152.5 सेंटीमीटर. या भरती मेळाव्यात धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ या 21 जिल्ह्यातील अविवाहित तरुणांना सहभागी होता येणार आहे.
            या भरतीसाठी 4 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 6 ते 10 वाजे दरम्यान भरती चाचणीला सुरवात होईल. याच दिवशी शारीरिक पात्रता चाचणी व लेखी परीक्षा होईल. 5 फेब्रुवारी, 2019 रोजी अनुकूलता चाचणी पेपर एक व दोन होतील. तसेच डायनॅमिक फॅक्टर चाचणी होईल. पात्र उमेदवारांनी सोबत येताना दहावीचे मूळ प्रमाणपत्र व त्याच्या 4 छायांकित प्रती, बारावीची मूळ गुणपत्रिका व मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या चार छायांकित प्रती, पासपोर्ट साईज आकाराचे दहा छायाचित्र, राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमाणपत्र (असल्यास) आणि त्यांच्या चार छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
            या भरती मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी एचबी पेन्सील, खोडरबर, शार्पनर, गम ट्यूब, स्टॅपलर, काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन आणावा. अधिक माहितीसाठी www.airmensilecetion.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.
000

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि. 31 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे गुरुवार, दि. 31 जानेवारी, 2019 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
गुरुवार, दि. 31 जानेवारी, 2019  रोजी  सोईनुसार श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगाव कडे प्रयाण. जामनेर, जि. जळगाव येथे आगमन व मुक्काम
                                                                   ०००

दहावी व बारावी परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 (1) (2) लागू


      जळगाव, दि. 31- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत 21 फेब्रुवारी, ते 20 मार्च, 2019 या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इ. 12 वी) व दिनांक 1 मार्च ते 22 मार्च, 2019 या कालावधीत माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी) घेण्यात येणार आहे.
            या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये. यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार दिनांक 21 फेबुवारी ते 22 मार्च, 2019 पर्यंत आदेश जारी करण्यात आले आहे.
            तसेच सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हा आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. त्याचबरोबर परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी. आय.एस.डी., फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉप्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावे. असेही जिल्हादंडाधिकारी श्री. निंबाळकर यांनी आदेश दिले आहे.
                                                                        ०००

वजनमापे तपासणीत आठ फेरीवाल्यांवर खटले दाखल - श्री. रा. भ. बांगर


        जळगाव, दि. 31:- जळगाव व रावेर येथील आठवडे बाजारातील फेरीवाले यांचेकडील वजनमापांची वैधमापन शास्त्र विभागामार्फत अचानक तपासणी केली आहे. यामध्ये ज्या फेरीवाल्यांडील वजनमापांत तफावत आढळून आली अशा आठ फेरीवाल्यांवर वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 अन्वये खटले दाखल करण्यात आले असून त्यांचेवर पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती श्री. रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी दिली आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीत अशासकीय सदस्यांनी फेरीवाल्यांकडील वजनमापांविषयी तक्रारी केल्या होत्या.  त्यानुसार वैधमापन शास्त्र विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी आठवडे बाजारातील फेरीवाले व इतर सर्वांनी आपले जवळील वजने व मापे यांची नियमित तपासणी जवळील निरीक्षक, वैधमापन शास्त्र यांचे कार्यालयातून करुन घ्यावी.
            याबाबत काही अडचणी असल्यास किंवा तक्रारी असल्यास दूरध्वनी क्र. 2241149 वर अथवा aclmialgaon@yahoo.in वर संपर्क करावा. असे आवाहन श्री. बांगर, सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००