जळगाव, दि. 7 (जिमाका)
- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या
तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या
लोकशाही दिनी एकूण 264 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये सहकार, जिल्हा परिषद, मनपा,
महसुल, कृषि, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या
तक्रारींचा समावेश आहे.
या लोकशाही दिनास अपर
जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत
सोनवणे, महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, जिल्हा माहिती अधिकारी विलास
बोडके, राहूल जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेचे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. बी. ए. बोटे, जिल्हा उद्योग
केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील
यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही
दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त
झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित
विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने
कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदार पुन्हा तक्रार घेऊन येणार नाही. लोकशाही
दिनात सर्वाधिक तक्रारी या सहकार विभागाच्या असल्याने या विभागाने बुडीत
पतसंस्थाची मालमत्ता जप्त करुन वसुलीची कारवाई करावी. वसुलीच्या रक्कमेतून
ठेवीदारांना रक्कम परत करण्यास प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने अवैध वाहतुक
करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी
संबंधित विभागप्रमुखांना दिल्यात. तर जिल्हा परिषद व महापालिकेने त्यांचेकडील
प्रलंबित तक्रारींवर कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
०००
No comments:
Post a Comment