Tuesday, 8 January 2019

जलयुक्तची कामे 31 जानेवारीपर्यंत पुर्ण करा जलयुक्त शिवार अभियान बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


            



         जळगाव  दि.8 (जिमाका)- सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी किशार राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात  जलयुक्त शिवार अभियान बैठकीत पार पडली.
         याप्रसंगी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हाधिकारी शुभांगी भारदे , जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक प्रकाश मोराणकर, श्री.नंदनवार, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी,सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृषि विभाग,लघु सिंचन जिल्हा परिषद, वरिष्ठ भू वैज्ञानिक विभाग, रोजगार हमी, जलसंधारण , जळगाव वन विभाग, यावल वन विभाग आदि विभागांकडून 2017-2018 व 2018-2019 या वर्षात  जलयुक्तच्या केलेल्या कामांचा व कामांच्या उपाययोजनांचा आढावा घेवून  प्राप्त अनुदान विहित मुदतीत खर्च होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना देवून कामे 31 जानेवारी पूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिल्यात.
            प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जलयुक्त  शिवार अभियानाच्या कामाचा लेखा-जोखा मांडून सन 2015-2016, 2016-2017, 2017-2018 या तीन टप्यातील कामांच्या प्रगतीची माहिती देवून 2018-2019 या चौथ्या टप्पात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच  चौथ्या टप्यासाठी शासनाकडे 40 कोटी अनुदानाची मागणी केली असून पैकी 25 कोटी लवकरच प्राप्त होतील असेही श्री.ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच उपस्थित सर्व तालुका कृषि अधिकाऱ्यांना जलयुक्त शिवारची कामे वेळेत पुर्ण करून अनुदान परत जाणार नाही याची काळजी घ्यावी.  अनुदान परत गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी राहील असेही त्यांनी सांगितले.
            बैठकीस उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या कामाची सद्यस्थितीची माहिती बैठकीत दिली.
000000

No comments:

Post a Comment