Tuesday, 1 January 2019

चारा साक्षरता अभियानानिमित्त चित्ररथाद्वारे जनजागृती





           जळगाव, दि.- संभाव्य चारा टंचाई विचारात घेता, पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील पशुधन केवळ जगविण्याचा विचार करणेत येत आहे. या सकारात्मक उद्देशाने राज्यभरात सध्य:स्थितीत उपलब्ध हिरवा चारा, पिके व वाळलेला चारा ह्या साधनसामुग्रीचे सुयोग्य शास्त्रोक्त नियोजन करण्यात येत आहे. या पद्धतीबद्दल पशुपालकांना माहिती देण्यासाठी दि. १ ते १० जानेवारी २०१९ या कालावधीत चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
            जिल्ह्यात या चारा साक्षरता अभियान रथ यात्रेची सुरुवात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे हस्ते हिरवी झेडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून करण्यात आली आहे. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. जे. गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. पी. एस. इंगळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एन.आर. पाटील, डॉ. मनिष बाविस्कर, डॉ. आर.एस.जाधव, डॉ. विकास नरवाडे, मुरघास निर्मिती तज्ञ, केव्हीके, ममुराबाद श्री. हेंमत बाहेती, श्री. गोरे सर इत्यादी उपस्थित होते.
        ही रथ यात्रा ग्राम पंचायत सभागृह, समाज मंदीर, चावडी, जिल्हा परिषद शाळेचे पटागंण, दुध संकलन केंद्र किंवा तत्सम ठिकाणी नेण्यात येणार आहेत. या अभियानात पशुपालक व शेतकरी बांधवाना उपलब्ध हिरवा, वाळलेला चाऱ्याचे सुयोग्य नियोजन, बचत तसेच आधुनिक व्यवस्थापन, चाऱ्यापासून मूरघास तयार करणे व टिकवणे चाऱ्याची सकसत्ता व पाकता वाढविणे, अझोला व हायड्रोफोनीक्स, तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिक व ध्वनीफित दाखविणे, चारा उत्पादन, साठवणूक व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती कृषि अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांचेमार्फत देण्यात येणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.    
                                                                              000

No comments:

Post a Comment