जळगाव, दि. २ -
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळवून
देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष
पाशा पटेल यांनी आज व्यक्त केले.
येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकरी
व जिनिंग कंपनीचे प्रतिनिधी यांची कार्यशाळा श्री. पाशा पटेल यांच्या उपस्थितीत
पार पडली, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
नंदकुमार महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
संजीव ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जडे, ॲङ प्रकाश पाटील, प्रदीप जैन,
उपविभागीय कृषि अधिकारी गोरक्ष लोखंडे, जिल्हा कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी आदि
उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना पाशा पटेल पुढे म्हणाले की, जळगाव
हा कापूस पिकाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन घेताना
चांगले, स्वच्छ व सक्षम उत्पादन घेतले तर भावही चांगला मिळतो. कापसाची प्रतवारी
चांगली पाहिजे यासाठी चांगल्या प्रतीचे वाण वापरले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी केंद्र व
राज्य शासन चांगल्या बियाणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देत आहे. त्यानुसार
शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगले उत्पादन घेतले पाहिजे. तथापि,
सध्याच्या परिस्थितीमध्ये एकट्या शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात चांगले उत्पादन घेणे
शक्य नसल्याने मोठया प्रमाणात सामुहिक शेती /गटशेती तसेच शेतकरी उत्पादन कंपन्या निर्माण करण्यावर
भर देण्यात येत आहे. उत्पादन कंपन्यांना प्रक्रिया उद्योगाशी जोडून शेतकऱ्यांना चांगला
भाव मिळवून देण्यासाठी कापूस उत्पादनात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न
करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी श्री. पटेल यांनी कापूस उत्पादक
शेतकरी, जिनिंग कंपनीचे संचालक, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन त्यांचे प्रश्न,
अडीअडचणी जाऊन घेतल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर, श्री. महाजन,
शास्त्रज्ञ श्री. जडे, ॲङ पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले. या कार्यशाळेस
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी, जिनिंग कंपनीचे संचालक, प्रतिनिधी मोठया
संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment