Thursday, 17 January 2019

मतदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी 1950 टोल फ्री क्रमांक


         जळगाव दि. 17 - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारांच्या शंकांचे व तक्रारींचे निरसन व्हावे, तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी. या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संपर्क केंद्रासाठी 1950 हा टोल फ्रीदुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
         निवडणुक विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी 25 जानेवारी, 1950 रोजी भारत निवडणुक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या दिनाचे औचित्य साधून निवडणुक आयोगाने 1950 क्रमांकाची टोल फ्री ही सुविधा देशभरात सुरु केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातही ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नाव समाविष्ठ अथवा दुरुस्त करण्यासह इतर शंकांचे निरसन या प्रणालीव्दारे होणार आहे.
            जिल्हा संपर्क केंद्रावर या सेवेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. जिल्हा संपर्क केंद्राची जबाबदारी महेश चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये संपर्क साधून नागरिकांना आपल्या प्रश्नांच्या शंकांचे निरसन करुन घेता येणार आहे. ही सुविधा लँडलाईन व मोबाईलवरुनही उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या कालावधीत ही प्रणाली 24 तास सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment