Tuesday, 29 January 2019

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 9 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    जळगाव, दि. 29 - वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवून घेण्याकरीता राष्ट्रीय  विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार संपुर्ण देशात एकाच दिवशी 9 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
     राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात या लोकअदालतीचे आयोजन केलेले असुन विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच वेळी एकाच दिवशी ही राष्ट्रीय लोकअदालत होईल. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जी. ए. सानप, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालतीस प्रारंभ होईल. या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सचिव, जिविसेप्रा, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव यांचे सहकार्य राहणार आहे.
            राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले इ. चे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकुण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपुर्ण खटले जडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत.
           त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत.
          राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीसाठी संपुर्ण जिल्हयातुन मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बॅका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकित रक्कमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे याचा नागरीकांनी लाभ घ्यावा.
           ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील. अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावेत. ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनी सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त खटले समोपचाराने निकाली काढण्यात यावे. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                            ०0०

No comments:

Post a Comment