Tuesday, 29 January 2019

श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत हरताळासह सहा गावांच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार


       जळगाव, दि. 29 - श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन अभियानातंर्गत  मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गाव समुहाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हरताळा, वढवे, चांगदेव, कोथळी, सालबर्डी, खामखेडा या गावांचा समावेश आहे. या गावांच्या विकासासाठी राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत  15  कोटी रुपयांचा निधी  प्राप्त होणार आहे. याबाबतचा कृति आराखडा शासनास पाठविण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निधीमधून परिसरातील पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.
     मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावसमुहाचा एकात्मिक गावसमुहाचा या मिशन समावेश आहे. या निधीमधून निवड झालेल्या गावांमधील ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे, आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यास मान्यता देण्यासाठी  जिल्हाधिकारी  किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर बोलत होते.
     या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा ग्रामीण विकस यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यावेळी म्हणाले की, राष्ट्रीय रुरबन अभियानातंर्गत हरताळा गाव समुहांची निवड करण्यात आली असून या गावात पर्यटनाला चालना देण्यासाठी उपलब्ध 15 कोटीच्या निधीतून 50 टक्के निधी खर्च करण्यात येणार असून उर्वरित निधी गावात कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी  प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम,  मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुरक्षा, स्वच्छता, नळाव्दारे पाणी पुरवणे, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत गटारे. गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, एल पी जी गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता व नागरिक सेवा केंद्रे यावर खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करुन गाव समुहांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या  योजना व राज्य शासनाच्या योजना नियोजनबध्द पध्दतीने एक केंद्राभिमुख रितीने व विशिष्ट कालमर्यादेत या गाव समुहामध्ये राबविणे अपेक्षित असल्याचेही किशोर राजे  निंबाळकर यांनी सांगितले.
     रुरबन समुहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांचा समुहांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे आपेक्षित आहे. या ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे, यामध्ये प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करुन देणे, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकास करतांना गरीबी व बेरोजगारी कमी करणे, अभियानांतर्गत निवडीच्या भागाचा सर्वगिण विकास करणे व ग्रामीण भागातील गुंतवणूकीस चालना देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
                                                                           ०००

No comments:

Post a Comment