जळगाव, दि. 11 - जलयुक्त् शिवार
अभियानातील सन 2016-17 ची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच सन 2017-18 ची
कामे लवकरात लवकर सुरु करुन ती वेळेत पूर्ण होतील यासाठी सर्व संबंधित विभागाच्या
यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावे. तसेच या अभियानातंर्गत करण्यात येणाऱ्या
कामांच्या दर्जावर विशेष भर देण्याच्या सुचना मृद, जलसंधारण व रोजगार हमी योजना
विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.
जिल्ह्यातील
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सुरु असलेल्या व यावर्षी सुरु करण्यात येणाऱ्या विविध
कामांचा आढावा येथील नियोजन भवनात आज मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे
सचिव एकनाथ डवले यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा
परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, यावल वनविभागाचे उप
वनसरंक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक
अनिल भोकरे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सचिव श्री. डवले
म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या
प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याची सन 2019 पर्यंत टंचाईमुक्त महाराष्ट्राकडे
वाटचाल सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही या अभियानात गेल्या तीन वर्षात 650 पेक्षा अधिक गावांची निवड
करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या 232 गावातील सर्व कामे
पूर्ण झाल्याने ही गावे जलस्वयंपूर्ण झाली आहे. यापैकी 151 गावांचा जलपरिपूर्णत:
अहवाल तयार करण्यात आला आहे. उर्वरित गावांचा अहवाल 26 जानेवारीपूर्वी तयार करुन
सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्यात. तसेच केलेल्या कामांचे जिओ
टॅगिंग केल्याशिवाय काम पूर्ण झाल्याचे समजले जात नसल्याने सर्व यंत्रणांनी
कामांचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचेही श्री. डवले यांनी सांगितले.
टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात 146 कोटी
रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये 4856 कामांचा समावेश होता. यापैकी
4576 कामे पूर्ण झाली असून 286 कामे प्रगतीपथावर असून आतापर्यंत 92 कोटी 36 लाख
रुपये खर्च झाला आहे. त्याचबरोबर यावर्षी या अभियानात 206 गावांची निवड करण्यात
आली असून यासाठी 96 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये 4343
कामांचा समावेश आहे. यामध्ये क्षेत्रीय उपाचाराची 3929 कामे आहे तर नाला उपचाराची
414 कामे समाविष्ठ आहे. या कामांमुळे जिल्हयात मोठया प्रमाणात पाणी साठविण्यास मदत
होणार असल्याचे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
या अभियानात चालूवर्षी निवडण्यात
आलेल्या गावांचा पाण्याचा ताळेबंद निकषांनुसार व्यवस्थित तयार करण्यात आला आहे
याची खात्री करावी. करण्यात येणाऱ्या कामामुळे गावाला जास्तीत जास्त लाभ कसा होईल
यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा तसेच कामांचा दर्जा योग्य राखावा. या अभियानातील
कामाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी
घ्यावी. या वर्षातील मंजूर कामांना विभागप्रमुखांनी तातडीने प्रशासकीय मान्यता
देउुन कामांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन कामे सुरु करावीत.
ज्या विभागाच्या कामांबाबत तक्रारी प्राप्त होतील त्यांच्यावर कठोर कारवाई
करण्याचा इशाराही सचिव श्री. डवले यांनी यावेळी दिला.
यावेळी सचिव श्री. डवले यांनी जिल्हयात
राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार,
सिंचन विहिरी आदि योजनेचाही आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत
जिल्हयाला देण्यात आलेल्या दोन हजार शेततळयांपैकी 1711 शेततळी पूर्ण झाल्याबद्दल
श्री. डवले यांनी यंत्रणेचे विशेष अभिनंदन केले. बैठकीचे सुत्रसंचलन कृषि उपसंचालक
अनिल भोकरे यांनी केले.
या बैठकीस जिल्हयातील सर्व उपविभागीय
अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तसेच
जिल्हा परिषद, जलसंधारण, वनविभाग, भुजल सर्वेक्षण, लघुसिंचन, सामाजिक वनीकरण
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment