Wednesday, 3 January 2018

पंधराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन संपन्न् बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील कलावंत घडण्यास मदत - दिग्दर्शक योगेश कुलकर्णी



          



        जिमाका- जळगाव, दि.3:- लहान मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी बालनाट्य स्पर्धा महत्वाचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कलाकार घडण्यासाठी निश्चितपणे मदत होते. असे प्रतिपादन ‘मोल’ चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश कुलकणी यांनी केले.
            शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 15 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची पहिली फेरी आजपासून येथील भैय्यासाहेब गंधे नाट्यगृहात सुरु झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन दिग्दर्शक योगेश कुलकणी यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके हे होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य श्रीपाद जोशी, नाट्य स्पर्धेसाठी पुणे येथून आलेले परिक्षक गिरीष मुतकर, शंकर घोरपडे, हनुमंत कुबडे, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, स्पर्धेचे समन्वयक विनोद ढगे आदि उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील कलाकरांना आपल्यातील कलागुण दाखविण्यासाठी बालनाट्य स्पर्धा हे हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक नामवंत कलावंतांनी आपल्या कलाक्षेत्रातील वाटचालीला बालनाट्य स्पर्धेपासून सुरुवात करुनच यश मिळविले आहे असे सांगून मी स्वत: ही माझ्या कारकिर्दिला या स्पर्धापासूनच सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके म्हणाले की, बाल कलाकरांचे सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी राज्य शासनाने राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेमुळे नाट्यक्षेत्रात अनेक कलाकर उदयास आले आहे. या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील जास्तीत जास्त बालकलाकरांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असते. भविष्यातील स्पर्धामध्येही ग्रामीण भागातील नाट्य कलाकरांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी श्रीपाद जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे समन्वयक विनोद ढगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले. या स्पर्धेच्या परिक्षकांचे स्वागत राज्य शासनाच्यावतीने जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास बालनाट्यप्रेमी, बाल कलाकार, त्यांचे पालक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेची सुरुवात मोनूच्या मनात या नाटकाची घंटा वाजवून करण्यात आली. त्यानंतर वयम् मोठम् खोटम्, युगांतर : शोकांतिका ते यशोगाथा, संस्काराची शिदोरी, देव माणसं या नाटकांचे सादरीकरण झाले.
            या नाट्य्‍ स्पर्धेत 6 जानेवारीपर्यंत दररोज 5 नाटके याप्रमाणे एकूण 21 नाटकांचे सादरीकरण होणार आहे. या कालावधीत दररोज दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत विविध नाटके सादर केली जाणार असून सर्व नाटकांसाठी प्रवेश विनामुल्य  आहे.
      गुरुवार 4 जानेवारी रोजी योगेश पाटील लिखित दादा, विभावरी मोराणकर लिखित भूत, धनंजय धनगर खित कमांडो एचटूओ, विशाल जाधव लिखित शाळा पुस्तकांची, अलका भटकर लिखित टेकडीचे गुढ.           
            शुक्रवार 5 जानेवारी रोजी धनंजय सरदेशपांडे लिखित एलियन्स द ग्रेट, समीर तडवी लिखित मी पारंबी, रेणुका भिडे लिखित खेळ रंगी रंगुया, योगेश पाटील लिखित मी मलाला, प्रदीप भोई लिखित स्वप्नांच्या पलिकडे.
            शनिवार 6 जानेवारी रोजी योगेश पाटील लिखित दादा, प्रदिप जंगम लिखित एक राज्य अंध्याचं, किरणकुमार अडकमोल लिखित एक होत आटपाट नगर, अमोल ठाकूर लिखित पिकनिक, हनुमार सुरवसे लिखित झपाटलेली चाळ,अमोल संगीता अरुण लिखित पुस्तक एके पुस्तक ही नाटके सादर केली जाणार आहे.
            यावेळी जळगावातील नाट्यप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
०००

No comments:

Post a Comment