जिमाका-जळगाव,
दि. 5:- कापूस पिकावरील शेंदरी बोंड
अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी कृषि विभाग आणि रासी सिडस प्रा. लि. यांच्या संयुक्तविद्माने चित्ररथाद्वारे
जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी कृषि विभाग व रासी सीडसच्यावतीने दोन चित्ररथ
तयार करण्यात आले असून कापूस पिकावरील शेंदरी/गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी
करावयाच्या उपाययोजनांची माहिती महिनाभरात या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हयातील
500 गावांमध्ये जावून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
येथील कृषि कार्यालयाच्या प्रांगणात आज
कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून या
जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी गोरक्ष लोखंडे,
तालुका कृषि अधिकारी विजय भारंबे, प्रविण आवटे, रासी सीड्स प्रा. लि. चे अमितकुमार,
रमेश शिरसाठ, गोपाळ पाटील, समाधान खैरनार, दिपक सपकाळ यांचेसह कृषि विभागाचे
अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात कापूस पिकावरील बोंड अळीमुळे
शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी
त्यांनी घ्यावयाची काळजी व करावयाची उपाययोजना याबाबत कृषि विभाग व रासी सीड्स
कंपनीचे प्रतिनिधी या चित्ररथाद्वारे जनजागृती करणार आहे. हा चित्ररथ दररोज दहा
गावांमध्ये जाणार आहे. तसेच दररोज सकाळ व संध्याकाळी एका गावात कंपनीचे प्रतिनिधी
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या चित्ररथांद्वारे 6 ते 31 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील
कापूस उत्पादक तालुक्यांतील किमान पाचशे गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोंडअळी
बाबत मार्गदर्शन व उपाययोजना सांगणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना
कापुस पिकावरील शेंदरी/ गुलाबी बोड अळीचे नियंत्रणासाठी निश्चित फायदा होईल असे
श्री. भोकरे यांनी याप्रसंगी सांगितले.
कापूस पिकावरील
शेंदरी / गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी करावयाची उपयोजना
कापूस पीक लवकरात लवकर शेतातून काढून टाकावे व फरदड
घेऊ नये. डिसेंबर महिन्यानंतर 5 ते 6 महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंड
अळीचे जीवनचक्र संपुष्ठात येते व त्यामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव
कमी होईल. शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त
अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात
येणा-या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये
शेळया, मेंढया तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. कपाशीच्या प-हाटयांमध्ये
किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवू नये. पीक
काढणीनंतर कपाशीच्या प-हाटया, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा
नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे
जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनींग-प्रेसिंग मिल तसेच
कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि
अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
०००००
No comments:
Post a Comment