जळगाव, दि. 23 :- माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहारामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. डिजिटल व्यवहार करताना आपली फसवणुक होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक नागरीकाने सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले.
ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी माध्यम प्रतिनिधीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना श्री बच्चन सिंह बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील कुऱ्हाडे, सहायक पोलीस निरिक्षक सागर शिंपी, पोलीस उप निरीक्षक, अंगत नेमाने आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग म्हणाले की, सन 2012 मध्ये राज्यात सायबर गुन्ह्यांची संख्या 521 होती. तर सन 2016 मध्ये ही संख्या 2380 इतकी झाली आहे. यावरुन आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवुन त्यांची फसवणुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या जगात मोफत काहीच मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागत असतो. यामुळे विश्वास न बसणाऱ्या जाहिरातींना बळी पडता डिजिटल व्यवहारात होणारी फसवणुक थांबविण्यासाठी डिजिटल व्यवहार करताना सजगता बाळगावी तसेच व्यवहार करतांना घ्यावयाच्या खबरादीची माहिती प्रत्येकाने करुन घेणे आवश्यक आहे. सोशल मिडियाचा वापर करताना त्यासाठी वयाचे निर्बंध नसल्याने प्रत्येक पालकाने आपला पाल्य सोशल मिडिया वापरत असताना जाणते अजाणतेपणे काही चुकीच्या बाबी तर करत नाही ना यासाठीही दक्ष राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देतांना सायबर गुन्ह्यांची ओळख, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, सोशल मिडीया, बॅकींग व इंन्शुरन्स संदर्भातील गुन्हे, सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, सायबर गुन्हा घडल्यानंतर काय करावे, सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाय योजना, नागरिकांची कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले.
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी सायबर जनजागृती कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद करताना माध्यम प्रतिनिधींनी आपल्या माध्यमांच्यामार्फत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.
जेष्ठ पत्रकार शेखर पाटील म्हणाले की, तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेटने जोडलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक यंत्राव्दारे गुन्हे करता येतात. आपण कोणतेही अॅप डाऊनलोड करताना त्यांचे नियम व अटी वाचत नाही. त्यामुळे त्यांना आपण नकळत स्वतःचा मोबाईल वापरण्याची परवानगी देतो. ते आपली माहिती इतरांना विकतात. त्यामुळे कोणतेही अॅप वापरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करुन श्री. पाटील यांनी सोशल मिडीयाच्या विविध प्रकारांची माहिती दिली. तसेच कोणत्या माध्यमातून कशाप्रकारे फसवणूक होवू शकते. होणारी फसवणूक टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदिंची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायबर शाखेचे कर्मचारी प्रदीप चौधरी यांनी तर उपस्थितांचे आभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी मानले.
कार्यशाळेस सर्व माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण पटवर्धन, रविंद्र गिरासे, सुरेश सानप आदिंनी परिश्रम घेतले.
000
No comments:
Post a Comment