Thursday, 25 January 2018

मतदार नोंदणी करुन लोकशाही अधिक बलशाली बनवू या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचे तरुणांना आवाहन














 जळगाव, दि. 25 - जगातील सर्वात बलशाली लोकशाही आपल्या देशाची आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. या देशातील तरुणांनी आपली मतदार नोंदणी करुन आपल्या देशाची लोकशाही अधिक बलशाही बनविण्यासाठी प्रयत्न करु या. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाचा 25 जानेवारी, 1950 हा स्थापना दिवस आहे. यानिमित्त जळगाव जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा मुख्य कार्यक्रम येथील नियोजन भवनात आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाकधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तडवी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार अमोल निकम, होमगार्ड चे जी. डी. भालेराव, यजुर्वेद महाजन, मुकुंद गोसावी आदि उपस्थित होते.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. मतदार नोंदणी बाबतची चित्रफित दाखविण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तची प्रतिज्ञा श्री. निंबाळकर यांनी उपस्थितांना दिली. प्रारंभी ओडीसा राज्यातील पुरी येथील कलाकारांनी आपल्या नृत्य कलाविष्कारातून राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व पटवून दिले. उपस्थितांनी त्यांच्या कलाविष्काराला भरभरुन दाद दिली.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाचा संकल्प आहे, की प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी करावी आणि प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा. लोकशाही परंपरा वृध्दिंगत होण्यासाठी देशातील सर्व 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करीत मतदानात सहभागी होणे आवश्यक आहे. मतदान हे पवित्र दान आहे. यामुळे मतदानाला मोठे महत्त्व असून नाव नोंदविल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येक निवडणुकीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाबद्दल आस्था ठेवत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्याचबरोबर आपले मित्र, शेजारी, नातेवाईक यांनीही मतदार नोंदणी करावी. याबाबत प्रचार व प्रसार करुन मतदार नोंदणीचा संदेश घराघरात पोहोचवा. असे आवाहनही जिल्हाधिकारी  श्री. निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.
याप्रसंगी प्रा. यजुर्वेद महाजन व मुकुंद गोसावी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कार, बक्षीस वितरण
यावेळी श्री. एस. पी. पाटील, रा. धामणगाव, श्री. राहुल सुर्यवंशी, रा. जळगाव या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी 2017- 2018 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तर मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यासाठी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा - प्रथम क्रमांक-यश सुनील इंगळे, न्यू इंग्लीश स्कूल, नशीराबाद, व्दितीय क्रमांक- अमर हारुन पटेल, प्रगती माध्यमिक विदयालय, जळगाव. तालुकास्तरीय निबंध स्पर्धा - प्रथम क्रमांक- भाग्यश्री मनोज देशमुख, आर आर विदयालय, जळगाव. व्दितीय क्रमांक -अक्षय अविनाश कदम, प्रगती माध्यमिक विदयालय, जळगाव. जिल्हा स्तरीय ज्ञान स्पर्धा- प्रथम क्रमांक -परिक्षीत मनोज सोनार, चोपडा, व्दितीय क्रमांक - वैष्णवी नंदू पाटील, पारोळा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अंध व अपंग मतदारांना तसेच नव मतदारांना मतदान कार्डचे वाटप करण्यात आले.
मतदार नोंदणी दिनाची सुरुवात जनजागृती दिंडीने
            राष्ट्रीय मतदार नोंदणी दिनानिमित्ताने आज सकाळी शहरातील काव्यरत्नावली चौकातून मतदार जागर दिंडी काढण्यात आली. ही दिंडी आकाशवाणी चौक मार्गे नियोजन भवनात आणण्यात आली. या दिंडीत अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, विलास बोडके, तहसीलदार अमोल निकम यांचेसह शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय हरीत सेना, एनसीसी, एनएसएस चे विद्यार्थी, शिक्षक, नागरीक, शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले. उपस्थितांचे आभार निवडणूक तहसीलदार श्री. थोरात यांनी मानले.
000

No comments:

Post a Comment