मुबंई, दि. 9 : जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताई
मंदिर कोथळी आणि बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ व श्री क्षेत्र नारायणगड या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या एकूण 59.08
कोटीच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील
शिखर समितीने मान्यता दिली.
जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील श्री संत
मुक्ताई मंदिर या ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 9.08 कोटीच्या आराखडयास यावेळी
मान्यता देण्यात आली. या निधीमधून अति महत्वाच्या व्यक्तीसाठी दालन व अंशत: खुले भक्त निवास,सभा मंडप व गर्भगृह, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, विद्युतीकरण, संगणकीकरण आदी कामे करण्यात येतील.
बीड जिल्हयातील श्री क्षेत्र नारायणगड या ब वर्ग
तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटीच्या विकास आराखड्यातून मंदिर परिसरात दगडी फरशी
बांधकाम, सार्वजनिक शौचालय, पाणी व जल व्यवस्थापन, सौर उर्जेवर आधारित विद्युतीकरण,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोशाळा, सांस्कृतिक सभागृह यासह एकूण सतरा कामे
प्रस्तावित आहेत.
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ
गडासाठी देखील 25 कोटीच्या विकास आराखड्यातून बहुउद्देशीय सभागृह,संरक्षण भिंत, लहान मुलांसाठी बगिचा व उद्यान, पाणी जल व्यवस्थापन, अंतर्गत व बाह्य सौर उर्जा यंत्रणा, गोशाळा बांधकाम,पोलीस मदत केंद्र आदीसह एकवीस कामे
प्रस्तावित आहेत. या दोन्ही आराखड्यास निधी उपलब्ध झाल्यानंतर तीन ते अठरा महिन्यांचा
कालावधी लागेल, असे बीडचे
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.
या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर,
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,
माजीमंत्री आमदार एकनाथ खडसे,
आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह
परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव
असिम गुप्ता आदि उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment