Monday, 1 October 2018

केळी पिकावरील करपा रोगाच्या निवारणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देणार राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ कापूस पिकावरील बोंडअळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3300 कोटी रुपयांची नुकसान भरपाई - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



           











        जळगाव, दि. 1 - येत्या पाच वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने आवश्यक त्या उपायायोजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी परंपरागत शेती पध्दतीत बदल करुन त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी माती परिक्षणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सिंचनाचे साठे वाढावे याकरीता जलयुक्त्‍ शिवार अभियान राबविण्यात येत असून ठिंबक सिंचनाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
            आमदार हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून व सुमन फाऊंडेशन, जैन इरिगेशन व ॲग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त ‍विद्यमाने यावल तालुक्यातील न्हावी येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील डिंगबरशेठ नारखेडे सभागृहात ‘अटल महाकृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, आमदार सर्वश्री. हरिभाऊ जावळे, उन्मेश पाटील, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी खा. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, गुरुमुख जगवाणी, रमेश चौधरी आदिंची उपस्थिती होती.
            यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी  देशात सुख, आनंद, सुरक्षितता आणण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी येत्या पाच वर्षात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला असून त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. प्रधानमंत्री  मोदीजींचे स्वप्न हे स्वप्न न राहता ते सत्यात यायला सुरुवात झाली आहे. पंरापंरागत  पीक पध्दतीत बदल करण्यात येत आहे. माती परिक्षण करुन शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. पाण्याचे साठे वाढावे यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. ठिबंक सिंचनाला प्राधान्य दिले जात आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवर चर्चा सुरु आहे. केळीच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले असून लवकरच भरपाई मिळेल. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 3300 कोटीं रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. केळीवरील संकट निवारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, राज्यातील 45 लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर 10 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कमेचा लाभ मिळाला आहे. याप्रमाणे राज्यातील 80 लाख शेतक-यांपैकी 55 लाख शेतक-यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
            मेळाव्याचे उद्घाटक वित्तमंत्री ना. मुनगंटीवार म्हणाले की, देशात लोकसंख्येच्या वाढीचा वेग वाढला आहे. त्याप्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढणे अपेक्षित आहे. उत्पादन वाढण्यासाठी महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास या कार्यशाळा महत्वपूर्ण असल्याचे सांगून ते म्हणाले की,  कार्यशाळेतील ज्ञान शेवटच्या गावातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिले. जळगाव जिल्ह्याच्या उन्नतीसाठी ज्याही योजना आखल्या जातील.  त्या पुर्णत्वास जाण्यासाठी जो काही निधी लागेल तो मिळवून देण्यासाठी मी सर्वोतोपरीने तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मेळाव्याचे अध्यक्ष जलसंपदामंत्री ना.महाजन म्हणाले की, दिवसेंदिवस निर्सगाचे चक्र बदलत आहे जमिनीचा पोत बदलत आहे त्यात पिकावरील संकटे वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी  आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन पीक पध्दतीत बदल केले पाहिजे. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविला पाहिजे. शेतीपुरक उद्योगाकडे वळाले पाहिजे. गट शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचबरोबर शेतीत अजून अधिक संशोधन होणे गरजेचे आहे असे सांगून केंद्र व राज्यातील सरकार हे शेतक-यांच्या हिताचे सरकार असल्याने ते शेतक-यांचे पाठीशी असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील शेळगाव बॅरेजसाठी बळीराजा योजनेतंर्गत 700 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या बॅरेजेसच्या माध्यमातून येत्या पावसाळयात पाणी अडविणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील 325 प्रकल्पांपैकी 275 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने राज्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
            सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, दैनंदिन जीवनातील बदलाला आपण मान्यता देणे. परंतु शेती व्यवसायात झालेले बदल आपण वेळोवेळी मान्य केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कार्यशाळेतील मार्गदर्शनाची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात जलयुक्ताची मोठ्या प्रमाणात कामे झाली. परंतु पाऊस कमी पडल्यामुळे सिंचन कमी आहे. शेतकऱ्यांनी शेतीपुरक उद्योगांकडे वळण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान जाणून घ्यावे. तसेच रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
            आ. खडसे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी शाश्वत सिंचन, शाश्वत बाजारभाव मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. उत्पादित मालाच्या दीडपट भाव देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगून केळी उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार जावळे यांनी अटल महाकृषि कार्यशाळा आयोजनामागील आपली भूमिका विशद केली. तसेच या कार्यशाळेस  उपस्थित शेतक-यांनी शेतक-यांचे बॅन्ड ॲम्‍बेसेडर होण्याचे आवाहन त्यांनी केले.
            कार्यशाळेचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. तसेच विविध पुस्तीकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी माजी गृह राज्यमंत्री जे.टी.महाजन यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात शेती क्षेत्राशी निगडीत विविध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
            यावेळी शरद महाजन, डॉ. के. बी. पाटील, माजी माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, अतुल बार्डोकर डॉ.संजीव पाटील, डॉ.धिरज कंखरे, मंगेश भास्कर, डॉ. आर. जी. पाटील, शिरीष टोंग, शैलेंद्र चव्हाण यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत कृषितज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीचे श्री. पपु यांनी तर आभार धनालाल चौधरी यांनी मानले.           या कार्यशाळेस यावल, फैजपूर, रावेर, सावदा चे नगराध्यक्ष, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच, कृषि क्षेत्रातील मान्यवर, प्रगतीशील शेतकरी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment