Wednesday, 31 October 2018

‘जलयुक्त शिवार’ मुळे चारा आणि पाण्याचा प्रश्न मिटला


           











           जळगाव, दि. 31 - गावाच्या पूर्वेला असलेल्या डोंगराळ भागात वन विभागाचे क्षेत्र आहे. याठिकाणी वन विभागाचा पाझर तलाव नादुरुस्त असल्याने या भागात कितीही पाऊस झाला तरी हे पाणी वाहून जात असे. त्यामुळे खरीपाच्या पिकांनाही पाणी कमी पडत असे. परंतु जलयुक्त शिवार अभियानातंर्गत वन विभगामार्फत या तलावाची दुरुस्ती करुन याठिकाणी बांध घातल्यामुळे या तलावातील पाणीसाठा 10 टीसीएमने वाढला आहे. त्याचप्रमाणे कृषि विभागामार्फत या तलावाच्या खालील बाजूस 28 नाला खोलीकरणाची, विहिर पुनर्भरणाची 4, पाझर तलाव दुरुस्तीची 2 व इतर एकूण 40 कामे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2017-18 मध्ये केली. याचा फायदा गावातील 150 विहिरींची पाणी पातळी वाढण्यास झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला संरक्षित सिंचन मिळण्यास तर मदत झालीच त्याचबरोबर गावातील जनावारांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. यापुढे गावाच्या शिवारात पडणारा पाण्याचा थेंब न थेंब जिरविण्यात येईल असा निश्चय केला आहे. पाचोरा तालुक्यातील पहाण या गावांतील ग्रामस्थांनी.
            राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व कृषी विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दौराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तालुका कृषि अधिकारी दिपक ठाकूर, पाचोऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई, सरपंच आप्पा महाजन यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात पाचोरा तालुक्यातील पहाण, भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी व चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे शासनाच्या विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली. 
            पाचोरा तालुक्यातील पहाण या गावात कापूस, मका, तूर, मुग, उडीद ही खरीपाची तर हरभरा, मका, चारापीके ही रब्बीची पिके घेतली जातात.  या गावातील विहिरींची संख्या 300 इतकी आहे. गावात प्रत्येक कुटूंबाकडे गाई व म्हशी आहेत. गावात संकरीत गाईची संख्या 1500 तर म्हशींची संख्या 400 इतकी आहे. या गावातून दररोज सरासरी 4 हजार लिटर दुधाचे संकलन होते. परंतु गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जनावरांना पिण्याचे पाणी व चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जलयुक्त्‍ शिवार अभियानामुळे यापैकी किमान 150 विहिरींची पाणी पातळी वाढली, नाला काठावरील शेतकऱ्यांना पिकांकरीता संरक्षित पाण्याची उपलब्धता झाली आहे. रब्बी हंगामातील बागायती क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जनावरांना लागणारे पाणी व बारमाही हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होत असल्याने दुधाळ जनावरांची संख्या वाढून शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ झाली आहे. असे येथील शेतकरी राधेशाम अभिमन पाटील यांनी सांगितले.
हे जे काही हिरंव दिसत आहे ते फक्त नालाबांधमुळे
            पाण्याचा मुख्य स्रोत काहीच नसल्यामुळे भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी हे गाव, गावात असलेल्या मेळनच्या नाल्यात साठणाऱ्या पाण्यावरच अवलंबून राहत असत. तसेच या गावातील शेतीही याच नाल्याच्या पाण्यावर अवलंबून असायची. परंतु गेल्या काही वर्षातील पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे खरीपाचे पीक घेणेही मुश्कील व्हायचे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात सन 2015-16 मध्ये गावाची निवड झाली. या अभियानातंर्गत गावात कंपार्टमेंट बंडींग, नाला खोलीकरण, शेततळे, गाळ काढणे, माती नाला बांध, सिमेंट नालाबांध खोलकरणाची 12 लाख रुपये खर्चून एकूण 10 कामे करण्यात आली. या कामांमुळे गावात 30 याच माती बंधारा घातल्याने 30 टीएमसी पाणी साठा वाढला आहे. यामुळे गावातील विहिरींची पाणी पातळी मोठया प्रमाणात वाढल्याचे गावाचे सरपंच संजय युवराज पाटील यांनी सांगितले. यामुळे गावाचा पाणी प्रश्न तर सुटलाच शिवाय खरीपाचे पीक वाचल्यामुळे कपाशीचे पीक प्रति हेक्टरी 6 क्विंटलपर्यत मिळाले आहे. तुम्हाला आता जे काही हिरवं दिसत आहे ते फक्त नालाबांधमुळेच. असे येथील शेतकरी शिवाजी हिम्मत पाटील यांनी सांगितले. 
वाघळी गावात 36 कामे झाली  यामुळे 130 टीएमसी पाणी साचले आहे या पाण्यामुळे 120 हेक्टर बागायती झाली आहे  तितुरी नदीवर बांध घातला आहे  यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढली आहे दिवसाला 8 तास विहिरी चालतात  यामुळे कपाशीला पाणी देऊ शकले असे शेतकरी म्हणतात.
 बंधाऱ्यामुळे गावाच्या गरजेपेक्षा 40 टक्के पाणी अधिक अडविले जात आहे
            चाळीसगाव तालुक्यातील तितुर नदीवर असलेल वाघळी हे 9 हजार लोकवस्तीच गांव. या नदीवर गावाजवळ बंधारा नसल्याने पावसाळयात नदीला येणारे सगळे पाणी वाहून जात असत. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला लागले होते. परंतु शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात सन 2016-17 मध्ये निवड झाली. आणि या अभियानात गावात नाला खोलीकरणाची 12, नविन सिमेंट नाला बांधची 11, साठवण बंधाऱ्यांची 2, साठवण बंधाऱ्यांची दुरुस्तीची 2, केटीवेअर दुरुस्तीची 1 व पाझर तलाव दुरुस्तीची 1 व विहिर पुनर्भरणाची 7 अशी 1 कोटी 40 लाख रुपये खर्चाची एकूण 36 कामे पूर्ण झाली. आणि गावात 307 टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. ही कामे करण्यापूर्वी गावात 731 टीसीएम पाणीसाठा होता. तो आता 1038 टीसीएम वाढला असून गावाची एकूण पाण्याची गजर 627 टीसीएम इतकी होती. या कामांमुळे गावाच्या गरजेच्या तुलनेत 411 टीसीएम पाणीसाठा म्हणजेच 40 टक्के पाणी अधिक अडविले जात असल्याचे सरपंच विकास चौधरी यांनी सांगितले.
            वाघळी गावात जलयुक्त शिवारची कामे होण्यापूर्वी गावातील इलेक्ट्रीक मोटारीमार्फत फक्त एक तास पाणी उपसा करता यायचा. ते आता किमान सहा ते आठ तासापर्यत उपसा करता येतो. त्यामुळे आमच्या लिंबू व डाळींबाच्या बागा वाचण्यास मोठी मदत झाली आहे. असे येथील शेतकरी अविनाश दौलतराव सुर्यवंशी यांनी सांगितले. तसेच जलयुक्तच्या कामांमुळे गावातील विहिरींची पाणी पातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची चिंता मिटल्याचे येथील शेतकरी दत्तात्रय खुशाल भोळे यांनी सांगितले.
            एकूणच जिल्ह्यात राज्य शासनाचे महत्वाकांक्षी असलेले जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध विभागांच्यावतीने करण्यात आलेल्या कामांमुळे विहिरींची पाणी पातळी वाढणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणे त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध होण्याबरोबरच अनेक गावांमध्ये खरीपाबरोबरच रब्बीच्या पिकांनाही मदत झाल्याचे दिसून येत आहे.
000

No comments:

Post a Comment