जळगाव येथे छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न
जळगाव, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : समाजातील संवेदना
टिकवून ठेवण्यासाठी सांस्कृतिक वारसा महत्वाचा आहे. मनुष्यातील मनुष्यपण जीवंत ठेवण्याचे
काम सांस्कृतिक वारसा करतो. तो पुढे नेणे आवश्यक असून जळगावच्या छत्रपती संभाजीराजे
नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम सुरू राहील, असे प्रतिपादन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
जळगाव
येथे आज दुपारी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सुमारे तीस कोटी रुपये खर्च
करुन बांधण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल, सार्वजनिक बांधकाम
विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा लाभक्षेत्र विकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री
गिरीश महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव
पाटील, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला
पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, चंदूलाल पटेल, एकनाथराव खडसे, संजय
सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, किशोर पाटील, उन्मेश पाटील, डॉ. सतीश पाटील, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी किशोरराजे
निंबाळकर आदी उपस्थित होते.
राज्य
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या नाट्यमंदिराची
प्रेक्षक क्षमता 1200 एवढी आहे. अद्ययावत ॲकॉस्टिकल
यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ध्वनी यंत्रणाही अद्ययावत असून अग्नीशमण
यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कलावंतांसाठी सुसज्ज असे
दोन ग्रीन रुम आहेत. याशिवाय कॉन्फरन्स हॉल असून त्याची आसन क्षमता 50 एवढी आहे. एवढेच नव्हे, कलावंतांसाठी दोन विश्रांती
कक्ष, रंगीत तालिम कक्ष, वाहन तळ कार्यरत आहे.
मुख्यमंत्री
श्री. फडणवीस म्हणाले, खानदेशची स्वतंत्र अशी संस्कृती आहे. जळगाव ही खानदेशातील सुवर्णनगरी
असून मोठा सांस्कृतिक वारसा या शहराला लाभला आहे. याच नगरीत कवयित्री बहिणाबाई चौधरी,
बालकवी, सानेगुरुजींचे वास्तव्य राहिले आहे, तर बालगंधर्वांचे बालपण येथे गेले आहे.
बहिणाबाईंच्या कवितातून प्रगल्भ विचार आपल्याला मिळतात. त्यांच्या कविता, विचार ही
सांस्कृतिक श्रीमंती आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून जळगाव शहराचा सांस्कृतिक वारसा
पुढे जाईल. त्यामुळे या नाट्यगृहावर सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी
आली आहे. जळगाव येथे बांधण्यात आलेले छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर अतिशय देखणे, सुसज्ज
असून ते राज्यातील पहिल्या पाच नाट्यगृहांमध्ये समावेश होईल, एवढे सुंदर असून जास्तीत
जास्त सांस्कृतिक कार्यक्रम या नाट्यगृहाच्या माध्यमातून व्हावेत, असेही मुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
जलसंपदा
लाभ क्षेत्र विकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरामुळे
जळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे हे नाट्य
मंदिर आहे. त्यामुळे जळगाव शहराची सांस्कृतिक वाटचाल पुढे नेण्यास मदत होणार आहे. या
नाट्यमंदिराच्या माध्यमातून जळगाव शहरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही
त्यांनी नमूद केले. आमदार श्री. भोळे यांनी आभार मानले.
०००००
No comments:
Post a Comment