Wednesday, 10 October 2018

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवतील युवा माहिती दूत प्रा. डॉ. एस. टी. इंगळे





कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात
राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी यांची कार्यशाळा

जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी युवा माहिती दूत महत्वाची भूमिका बजावतील. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी हे समाजसेवेचे काम पूर्ण करतील, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. टी. इंगळे यांनी येथे केले.
राज्य शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके (जळगाव व धुळे), जगन्नाथ पाटील (नंदुरबार), राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. माधव कदम (नंदुरबार), प्रा. विजय मालते (जळगाव), प्रा. वाल्मीक आढावे (धुळे), विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. पवन पाटील आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. इंगळे म्हणाले, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे सव्वा लाख एवढी आहे. त्यापैकी राष्ट्रीय सेवा योजना व अन्य विद्यार्थी मिळून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांची आपल्याला युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करावयाची आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना कडून 120 तास श्रमदानाचे काम अपेक्षित आहे. त्यापैकी 20 तास विद्यार्थ्यांनी युवा माहिती दूत म्हणून काम करावे, असेही प्रा. डॉ. इंगळे यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके म्हणाले, युनिसेफ, राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून युवा माहिती दूतांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. माध्यमाचे स्वरूप बदलत आहे. समाज माध्यमे पुढे आहेत. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन तरुण युवा माहिती दूताची भूमिका सक्षमपणे निभावतील. राज्यात सुमारे 22 लाख महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यापैकी दहा टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर सुमारे दोन कोटी लाभार्थ्यांपर्यंत  शासनाच्या विविध योजना पोहोचू शकतील. या योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे.
प्रा. डॉ. कदम म्हणाले, युवक या देशाचे भवितव्य आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांचा विधायक दृष्टिकोन गावागावांत पोहोचवतील. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक युवा माहिती दूत योजना समजून घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. आढावे म्हणाले, शासकीय योजनांची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक परिणामकारकरीत्या पोहोचवतील. युवा माहिती दूत शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती लाभार्थ्यांना देतील. त्यामुळे खरा लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. मालते, प्रा. पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली. प्रा. दीपक सोनवणे, प्रा. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनवणे यांनी आभार मानले. स्वप्नील राठोड, माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, दूरमुद्रक चालक मनोहर पाटील (धुळे) आदींनी संयोजन केले.  
०००००

No comments:

Post a Comment