जळगाव, दि. 19 :- एकत्रित कुटुंब
पध्दतीचे दिवसेंदिवस होणाऱ्या विघटनामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत असल्या
तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभव आणि विचारांची समृध्द संपत्ती असून आपण सर्वांनी
ही संपत्ती जपली पाहिजे, असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नियोजन भवन येथे दिनांक 19 ऑक्टोंबर 2018 रोजी
दुपारी 3.00 वाजता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात
केले.
मा. जिल्हाधिकारी
श्री. किशोर राजे निंबाळकर हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. समाज कल्याण अधिकारी
योगेश पाटील, डॉ. शाम सोनवणे यांनी कायदे व कल्याणकारी योजना या विषयी तर डॉ.
ज्योति गाजरे यांनी आहार , व्यायाम व नियमित आरोग्य तपासणी विषयक मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ
नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या
माध्यमातून देण्यात आली. श्री. डी. टी. चौधरी यांनी कायदा तयार करण्यासाठी
पाठपुरावा तरतुदी वर प्रकाश टाकून दृय्यम भुमिका स्विकारुन व्यसन सोडण्यावर भर
दिला.
जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर पुढे म्हणाले की, ज्येष्ठ
नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ सन्मानाने घालविता
यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत
राहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क आणि सार्वजनिक मदत
मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार 1
ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिकांकडे
संपन्न असा अनुभव असतो. या अनुभवाच्या माध्यमातून ते राष्ट्र विकासाला मदत करू
शकतील. त्यामुळे त्यांनी आपले अनुभव सांगितले पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी शेवटी नमूद केले.
यावेळी अधिकारी, पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित
होते. प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी केले.
०००
No comments:
Post a Comment