Monday, 29 October 2018

पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन आतापासूनच करा - पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर





        जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील काही तालुक्यात दुस-या टप्यात पिण्याच्या पाणी व जनावरांना चारा टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सर्वसंबंधित यंत्रणांनी आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे व पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करावे. अशा सुचना राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी दिल्यात.
         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री श्री. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार श्रीमती स्मिता वाघ, सुरेश भोळे,  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, रोहयो उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांचेसह महसूल, जलसंपदा, पशुसंवर्धन, कृषि विभागातील अधिकारी उपस्थित होते.
            ना. महादेव जानकर म्हणाले की, राज्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना राबविली आहे. त्याच धर्तीवर आता जनावरांच्या चाराटंचाई निवारण्यासाठी राज्यात चारायुक्त शिवार योजना राबविण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्यांच्या पडीत जमीनीवर चारा लागवड करावी. यासाठी शासन त्यांना ठोंबे पुरविणार असून त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणाबरोबरच लागवडीसाठी अनुदानही देणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शिवारात चारा लावल्यानंतर हा चारा त्यांना गावातील जनावरांसाठी द्याव्याचा आहे. या चाऱ्याची रक्कम शासन संबंधित शेतकऱ्यांना देईल. यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधून जळगाव जिल्ह्यासाठी 55 लाख रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
            पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर यावेळी म्हणाले की, राज्यात 46 लाख पशुधारक आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना अनुदान दिले जाते. पशुंची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली असून त्यामुळे पारदर्शकता येणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना दुधाच्या अनुदानासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री जानकर पुढे म्हणाले की, राज्यात प्रत्येक गावात पशुसखी हे पद मानधन तत्वावर भरण्यात येणार असून पशुसखींना पशुसंवर्धनाबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचे काम अंगणवाडी सेविकासारखेच राहणार असून त्यांना गावातच पशुसंवर्धनाचे काम करावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
          श्री.जानकर पुढे म्हणाले की जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठया प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. केळी व बटाटाचे चीप बनविण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गरजू लोकांना प्रशिक्षण देवून केळी पासून चांगल्या प्रकारच्या चीप बनविण्यात येईल. यातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी शासन मानव विकास संसाधन विभागातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रस्त्याअभावी एस. टी. बंद केली गेली किंवा कसे याबाबतचा आढावा घेतला. एस. टी. सेवा अभावी मुली शिक्षणापासून वंचीत राहणार नाही. यासाठी संबंधित विभागाने काळजी घ्येण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावळी त्यांनी पिण्याचे पाणी, चारा टंचाई, शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, ग्रामीण पाणी पुरवठा, रोजगार हमी योजनाची सुरु असलेली कामे याबद्दल सविस्तर आढावा घेतला.
            जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्ह्यात भविष्यात उद्भवणारी टंचाई परिस्थिती व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
जानकरांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा
            श्री. महादेव जानकर यांनी आज जळगाव खुर्द व तिघ्रे या गावातील शेतक-यांच्या शेतात जावून कपाशी, तुर व केळी पीकाची पाहणी करुन त्यांच्याशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडीअडचणी व सुचनांवर शासनस्तरावर निश्चितपणे विचार करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
०००

No comments:

Post a Comment