Friday, 12 October 2018

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आज महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन

     जळगाव, दि. 12 - राज्य शासनाच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने महाराष्ट्रातील नवउद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप यांना कल्पना मांडण्यासाठी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेतंर्गत शनिवार, दिनांक 13 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यशाळा (बूटकॅम्प) आयोजित करण्यात आली आहे.
        महाराष्ट्रातील तरुणांच्या नवउद्योजकीय संकल्पनाद्वारे नवीन उद्योग सुरू होवून तरूण आत्मनिर्भर व्हावेत. याउद्देशाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा काढण्यात आली आहे. 4 आक्टोबर पासून या यात्रेस प्रारंभ झाला असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे या यात्रेची सांगता होणार आहे. जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आजी-माजी विद्यार्थी तसेच नाविन्यपूर्ण कल्पना असणारे नागरिक देखील यात  सहभागी होवू शकणार आहे.
     या कार्यक्रमास नवउद्योजकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रसिध्द उद्योगपती श्री. आनंद कोठारी आणि चार्टर्ड अकाउटन्टस श्री. धरम साखला हे ज्युरी (तज्ञ परिक्षक) पॅनल सदस्य म्हणून तर श्री. जी. बी मोदी हे मेंटर (मार्गदर्शक) म्हणून उपस्थित राहणार आहेत.  
             नवीन उद्योग उभारणीच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना या कार्यशाळेत त्यांना मांडता येणार आहेत. उद्योग उभारणीची सविस्तर माहिती, कर्ज याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना उद्योगाबाबत नाविन्यपूर्ण कल्पना मांडायच्या आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अथवा कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. भूषण चौधरी यांच्या 9823452539 किंवा प्रा. विकास गीते यांच्या 9420067321 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनिल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                       000

No comments:

Post a Comment