जळगाव
दि. 29 :- जिल्ह्यातील पंधरापैकी तेरा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण
झाली आहे. दृष्काळी परिस्थितीत लागू करावयाच्या सर्व उपाययोजना शासनाने तातडीने
लागू केल्या आहेत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व
दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी यावल, जि. जळगाव येथे बोलतांना आज केले.
यावल पंचायत समितीच्या सभागृहात आज यावल तालुका दुष्काळ
परिस्थितीची आढावा बैठक ना. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती . यावेळी ते बोलत
होते. या बैठकीस आ. हरिभाऊ जावळे,
नगराध्यक्षा सुरेखा कोळी, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती उमाकांत
पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, तहसिलदार
कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी वासुदेव पाटील यांचेसह विविध विभागांचे
तालुकास्तरीय अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. महादेव जानकर यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळी
परिस्थिती उदभवल्यामुळे शेतकरी अडचणीत असून यावर मात करण्यासाठी शासनाने
शेतकऱ्यांसाठी सात प्रकारच्या उपाययोजना तातडीने लागू केल्या आहेत. यामध्ये
प्रामुख्याने वीज कनेक्शन कट न करणे, वीज बीलात सवलत,चाऱ्यासाठी बीयाणे उपलब्ध
करुन देणे, पीक कर्जाची वसुली थांबविणे, शेतकऱ्यांच्या मुलांची उच्च शिक्षणाची फी
शासन भरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. जानकर पुढे
म्हणाले की, यावल तालुक्याची सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी
मेगारिचार्ज प्रकल्प होण्यासाठी शासन पातळीवरुन तातडीने प्रयत्न करणार असल्याचेही
त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त
शिवार ही योजना राबविण्यात येत असून
जिल्ह्यातील बहुतांशी प्रकल्प वन विभागाच्या जमिनीवर असल्यामुळे या तलावातील गाळ शेतकऱ्यांना
शेतीत टाकण्यासाठी अडचणी येत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यातून
लवकरच मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना पिण्याचे
पाणी, चारा तातडीने उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
यासाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांशी
साधला संवाद
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आढावा
बैठकीनंतर यावल तालुक्यातील हिंगोणा, पिंपरुड व पाडळसा या गावातील शेतकऱ्यांच्या
शेतावर जावून त्यांनी लावलेल्या कपाशी, तूर, केळी आदि पिकांची पाहणी करुन या गावातील शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी
केले. यावेळी शेतकऱ्यांनी पाऊस कमी
प्रमाणात झाल्यामुळे कपाशी वेचणीचे पैसे सुद्धा उत्पादनातून निघणार नसल्याचे
सांगितले. यावेळी मंत्री जानकर यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, दृष्काळी
परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन
दिले.
000
No comments:
Post a Comment